‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा काश्मीरमध्ये लागू करण्याची आवश्यकताच उरणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया कोणत्याही स्थितीत थांबायला हव्यात, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला बजावले. या दहशतवादी कारवायांवर भारताची करडी नजर असेल, असे सांगताना राजनाथ यांनी दहशतवादाबाबत सहनशून्य भूमिकेचा पुनरुच्चार केला.
समुद्री चाच्यांविरोधात भारतीय नौदलाच्या कारवाईचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एडनचे आखात, तांबड्या समुद्रात चाच्यांविरोधात कारवाई करीत नौदलाने व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजनाथ म्हणाले.
‘पाककडून राहुल यांची प्रशंसा चिंतेची बाब’
पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रशंसा करणे ही चिंतेची बाब आहे, असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशाच्या नेत्याच्या राहुलप्रेमाबद्दल काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही सिंह यांनी केली. हिंदू-मुस्लीम यांच्यात फूट पाडून काँग्रेस आगीशी खेळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘घटनेत बदल नाहीच, आरक्षणही राहणार’
‘भाजप सरकार राज्यघटनेत कधीच बदल करणार नाही. तसेच आरक्षणही रद्द करणार नाही’, अशी स्पष्टोक्ती राजनाथ सिंह यांनी केली. राज्यघटना आणि आरक्षण या दोन्ही मुद्यांवर काँग्रेस मतांच्या राजकारणासाठी जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. पुढील पाच वर्षांत ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘सीमावादाबाबत चीनशी सकारात्मक चर्चा
पूर्व लडाख सीमावादावर चीनशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. हा सीमावाद लवकरच संपुष्टात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. चीनलगतच्या सीमाभागात भारत वेगाने पायाभूत सुविधा विकसित करीत असल्याचे नमूद करताना देशाच्या सीमा सुरक्षित राहतील, अशी ग्वाही सिंह यांनी दिली.