PM Narendra Modi: पाक अणुबॉम्बही हाताळू शकत नाही, पंतप्रधान मोदींची ओडिशामध्ये कॉंग्रेसवर टीका

वृत्तसंस्था, फुलबनी : ‘तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २६ वर्षांपूर्वी (१९९८) पोखरणमध्ये अणुचाचणी केली. त्यामुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली. मात्र, काँग्रेस भारतीय नागरिकांना पाकिस्तानच्या अण्वस्त्राची भीती दाखवत आहे. परंतु, अणुबॉम्ब हाताळू शकत नाही, अशी पाकिस्तानची अवस्था आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.ओडिशामध्ये प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबाबतच्या विधानावरून काँग्रेसला लक्ष्य केले. ‘काँग्रेस पक्ष नेहमीच भारतीयांना पाकिस्तानच्या अण्वस्त्राची भीती दाखवत आला आहे. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वर्षे दहशतवाद फोफावला. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याऐवजी काँग्रेस पक्ष मतपेढीच्या राजकारणासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यावर भर द्यायचा. याउलट वाजपेयी सरकारने जगाला भारताच्या सुरक्षा सज्जतेचे दर्शन घडविले. अनिवासी भारतीयांनाही पोखरण चाचणीचा अभिमान वाटला. भारताने आपले सामर्थ्य दाखवून दिले’, असे मोदी म्हणाले.

‘पाकिस्तानकडे अण्वस्त्र असल्याने त्या देशाबाबत कठोर भूमिका घेण्याबाबत काँग्रेसने नेहमीच सावध पवित्रा घेतला. या भित्र्या लोकांनी (काँग्रेस) देशातील जनतेची उमेद संपवून टाकली’, अशी टीका मोदी यांनी केली. ‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असले तरी ते हाताळण्याची क्षमताच त्या देशाने गमावली आहे. पाकिस्तान आता अणुबॉम्ब विकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या बॉम्बचा दर्जा निकृष्ट असल्याने ते कोणी घेण्यासही तयार नाही’, अशी टोलेबाजी मोदी यांनी केली.

मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही यावेळी लक्ष्य केले. बिजू जनता दलाच्या सरकारमुळे ओडिशाची अस्मिता धोक्यात असल्याचे मोदी म्हणाले.
Mani Shankar Aiyar : पाकिस्तानकडे अणूबॉम्ब, भारताने आदर राखावा; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी तारे तोडले
‘पाकव्याप्त काश्मीर मिळवणारच’

हैदराबाद : ‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याच्या भीतीने देशातील सर्वांत जुन्या पक्षाला पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचा हक्क सोडायचा आहे. मात्र, जोपर्यंत भाजप अस्तित्वात आहे, तोपर्यंत हे होणे अशक्य आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग असून, आम्ही तो परत मिळवू’, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी व्यक्त केला. काँग्रेसमध्ये सर्जिकल स्ट्राइक किंवा हवाईहल्ले करण्याची धमक नाही. मात्र, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या देशावर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या १० दिवसांत सर्जिकल स्ट्राइक किंवा हवाईहल्ले करून त्यांचा खात्मा केला’, याची आठवण शहा यांनी यावेळी करून दिली.

Source link

bjp vs congresselection campaignodisha lok sabhapm modi criticizes congressPM Modi Rally In Odisha
Comments (0)
Add Comment