West Bengal: मुस्लिम मतदार कोणत्या पक्षास अनुकूल? मत खेचण्यासाठी भाजपसह ‘तृणमूल’कडून प्रयत्न सुरु

विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचा कौल निर्णायक आहे. तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात एकगठ्ठा येणारी ही मते आपल्याकडे खेचण्याकरिता काँग्रेस-डाव्या आघाडीचेही प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, भाजपने या मतांना वगळूनच राजकारण आखल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंगाली भाषेत बोलायचे झाले, तर ही मते कोणाला ‘ओनुकूल’ म्हणजेच अनुकूल राहणार आहेत, याची उत्सुकता आहे.

पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या एकूण ४२ पैकी १८ जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. चौथ्या टप्प्यापर्यंत यातील ११ जागांवर मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यात उलुबेरिया या जागेसाठी मतदान होणार आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर येथे सर्वाधिक सुमारे ६४ टक्के, तर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील मथुरापूर येथे सुमारे ३२ टक्के मुस्लिम मतदार असल्याचे मानले जाते. बहरामपूर येथून काँग्रेस-डाव्या आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात तृणमूलने माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. युसूफ यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातून निवडणूक लढले. मात्र, ते अपयशी ठरले होते. बहरामपूरच्या मुस्लिम मतदारांकडे डोळा ठेवूनच तृणमूलने युसूफ यांना उतरविले आहे. तसे पाहिले तर डाव्या पक्षांची मदत नसतानाही बहरामपूरमधून अधीर रंजन चौधरी सहज निवडून येतात. यंदा त्यांचे मताधिक्य किती अधिक राहणार, यावरच चर्चा सुरू आहे.

मतदारांचा बदलता कौल

सन २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील मुस्लिमबहुल रायगंज आणि मालदा उत्तर या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळविला होता. राज्यात २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांमुळे तृणमूलच्या जागा वाढल्या. मात्र, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील विधानसभेच्या सागरदिघी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूलला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तेव्हा मतदारांनी काँग्रेसला कौल दिला होता. यामुळे तृणमूलच्या मतांमध्ये आपल्याला वाटा मिळू शकतो, असा विश्वास काँग्रेससह डाव्यांमध्ये निर्माण झाला आहे.

हिंदूंना दुय्यम स्थान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप तृणमूलवर सडकून टीका करत आहे. हिंदूंना राज्यात ‘द्वितीयो दर्जा’ म्हणजे दुय्यम स्थान दिले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. तृणमूलकडून या आरोपाचे खंडन केले जात आहे. ‘मोदींची भाषा बंगालच्या व्यापक विचारसरणीला कमी लेखणारी आहे. यातून आमच्या राज्याच्या बदनामीचा कट केला जात आहे’, असे हावडा स्टेशन येथील तृणमूलचे ज्येष्ठ कार्यकर्ते बिनायक पाल सांगतात.

भाजप, डाव्यांचे जातीय कार्ड

डाव्या आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्याचे नेतृत्व मोहम्मद सलीम यांच्याकडे दिले आहे. ते मुर्शिदाबादमधून रिंगणात आहेत. त्यांचा सामना तृणमूलचे विद्यमान खासदार अबू तेहर खान यांच्याशी आहे. या लढाईत भाजपने गौरीशंकर घोष हा हिंदू उमेदवार दिला आहे. मालदा उत्तर आणि रायगंजप्रमाणे जातीय गणितांमधील विभाजनातून मुर्शिदाबाद आपल्याकडे येईल, असा विश्वास भाजपला वाटतो.
West Bengal: तृणमूल काँग्रेसचा स्वकियांशीच लढा! उमेदवार नसल्याने भाजपही हतबल
मुस्लिमबहुल मतदारसंघ

बहरामपूर, जंगीपूर, मुर्शिदाबाद, रायगंज, मालदा दक्षिण, मालदा उत्तर, बसिरहाट, बिरभूम, जादवपूर, डायमंड हर्बर, जयनगर, मथुरापूर, कृष्णनगर, उलुबेरिया, कुंचबिहार, बालुरहाट, कांथी, तमलुक.

२०१९ मध्ये कोणाकडे किती जागा? (ग्राफिक्ससाठी)
तृणमूल ८
भाजप ८
काँग्रेस २
एकूण जागा १८

Source link

Hindu voterskolkatalok sabha election 2024Muslim votersNarendra ModiTrinamool CongressWest Bengal electionsतृणमूल काँग्रेसपश्चिम बंगाल निवडणूक
Comments (0)
Add Comment