चिनसुरा येथे तृणमूल काँग्रेसच्या हुगळीच्या उमेदवार रचना बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘आम्ही इंडिया आघाडीला नेतृत्व देऊ आणि त्यांना बाहेरून सर्व प्रकारे मदत करू. बंगालमधील आमच्या माता-भगिनींना कधीही कोणतीही अडचण येणार नाही आणि १०० दिवसांच्या नोकरीच्या योजनेत सहभागी होणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही हे सुनिश्चित करणारे सरकार आम्ही स्थापन करू.’ तसेच त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सीपीएम किंवा बंगाल काँग्रेसचा यामध्ये समावेश नाही, असे देखील ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणूकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर पाचव्या टप्प्यात २० तारखेला ६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ४९ लोकसभेच्या जागांवर मतदान पार पडणार आहे. यात बंगालमधील ७ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. याआधीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला बाहेरुन समर्थन देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ममता बॅनर्जी यांनी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान इंडिया आघाडीशी फारकत घेतली होती. ममता बॅनर्जी या वारंवार घेत असलेली ‘एकला चलो’ची भूमिका त्यांचं राजकीय अस्थैर्य दर्शवत असल्याची टिप्पणी देखील राजकीय जाणकारांनी केली होती. आता निवडणुकीच्या मध्यात ममतांनी ही भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीचं भविष्य काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
पंतप्रधान मोदींवर डागली तोफ
बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर दोन महिन्यांच्या कालावधीत निवडणुकांचे वेळापत्रक आखल्याबद्दल टीका केली आणि तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून भाजपच्या बाजूने निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला. बॅनर्जी म्हणाल्या, ‘निवडणूक आयोग एक बाहुली आहे जी मोदींच्या सूचनेनुसार काम करते. अडीच महिन्यांपासून मतदान सुरू आहे, तुम्हाला (निवडणूक अधिकाऱ्यांना) सर्वसामान्यांच्या समस्यांची कधी जाणीव झाली का?