लातूर : औसा येथे एका ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर जगन्नाथ माळी असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
औसा येथील माळी गल्लीतील शंकर माळी हा तरुण अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन पिकाची नासाडी झाल्यामुळे वैफल्यग्रस्त झाला होता. मोठं नुकसान झाल्याने नैराश्यात गेलेल्या शंकर माळी यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
शंकर माळी यांच्या कुटुंबाला ५८ गुंठे जमीन असून खरीप पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, असा परिवार आहे.
दरम्यान, सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन केल्यानंतर शनिवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर माळी समाज स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.