रामदास कदम प्रकरणात नवा ट्विस्ट; ज्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानेच केला खुलासा

हायलाइट्स:

  • माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर विविध आरोप
  • मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्हायरल केली ऑडिओ क्लिप
  • आता प्रसाद कर्वे यांनी केला खुलासा

रत्नागिरी : खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्याबाबत केलेले आरोप दापोली येथील शिवसेना कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी फेटाळून लावले आहेत. आपण हे सगळे आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती कर्वे यांनी शनिवारी सायंकाळी दिली.

रामदास कदम यांच्या सांगण्यावरून आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी दापोलीतील अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिली, असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत बोलताना प्रसाद कर्वे म्हणाले की, ‘वैफल्यग्रस्त अवस्थेत नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आरोप केले आहेत. माझा व किरीट सोमय्या यांचा काहीही संबंध नाही. खेडेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी मी कधी अशी माहिती दिली हे काढावे व तसे पुरावे द्यावेत. मी गेली ३५ वर्षे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर व माझ्यात कलह निर्माण व्हावेत हाच उद्देश ठेवून मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम यांनी ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करून माझी बदनामी केली आहे,’ असा आरोप कर्वे यांनी केला आहे.

‘सर्व आरोप खोटे’; कथित ऑडिओक्लिप प्रकरणी रामदास कदम कोर्टात जाणार

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधत आपण माहितीचा अधिकार वापरुन मागासवर्गीय वस्ती नसताना विशेष घटक योजनेतून भडगाव येथे लाखो रुपये खर्च करून पूल बांधला, मागासवर्गीय नसताना गृह प्रकल्प सुरू आहे, या सगळ्याबाबत तक्रार केली आहे आणि यासंदर्भातील माहिती आपण रामदास कदम यांना माहिती अधिकार वापरून दिली. बाकी माझा कोणताही व कधीही फारसा संबंध रामदास कदम यांच्यासोबत नाही,’ असा दावाही प्रसाद कर्वे यांनी केला.

दरम्यान, शनिवारी दुपारी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम, प्रसाद कर्वे व किरीट सोमय्या यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप माध्यमांकडे देत त्या ऐकवून दाखवल्या. मुरूड येथील वादग्रस्त ठरलेल्या रिसॉर्टची माहिती कर्वे व रामदास कदम यांनीच सोमय्या यांना पुरवली आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न रामदास कदम यांनी केल्याचा आरोप वैभव खेडेकर आणि संजय कदम यांनी केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्वे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

Ramdas KadamRatnagiri newsरत्नागिरीरामदास कदमशिवसेना
Comments (0)
Add Comment