४ जून हा दिवस कसा असणार?
आम्ही यंदा निवडणूक जिंकण्यासाठीच लढत आहेत आणि जिंकू. मी आत्तापर्यंतच्या टप्प्यांमध्ये जे चित्र पाहिले ते काँग्रेससाठी सकारात्मक आहे. मतदारांमध्ये एक सुप्त लाट आहे… लोक बदलासाठी मतदानाला जात आहेत. भाजप सरकारचा उद्दामपणा लोकांना आवडलेला नाही व आवडत नाही. भाजप आणि ‘एनडीए’मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महागाई, बेरोजगारीने हैराण झालेल्या लोकांना बदल हवा आहे व आम्हाला (काँग्रेससह इंडिया) नवे सरकार बनवायची जबाबदारी देशातील जनता देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदाची निवडणूक वेगळी कशी?
ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तिथे जोरदार अँटी इन्कम्बन्सी तयार झाली आहे. अनेक पक्ष लढत असले तरी केवळ काँग्रेसच्या जाहीरनाम्याचीच चर्चा होत आहे. अग्निवीर योजना रद्द करणार, महिलांना व गरिबांना आर्थिक मदत, जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, प्रत्येक गरीब कुटुंबाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत हे मुद्दे असलेला आमचा जाहीरनामा जनतेला आवडला म्हणूनच तर भाजपला पुन्हा धार्मिक मुद्यांकडे वळावे लागले. आज लोकशाही व राज्यघटना वचविणे हे पहिले आव्हान आहे.
– राज्यघटना बदलण्याच्या आरोपावर भाजपचा पलटवार असा आहे की, काँग्रेसनेच घटनादुरुस्ती अधिक वेळा केली.
मुळात त्यांना ही चर्चा का सुरू करावी लागली? काँग्रेसने असे कधीच केले नाही. तुम्ही राज्यघटना बदलणार नाही तर त्याचे वारंवार खंडन करण्याची भाजपला गरज का वाटली? राजीव गांधी यांचेही ४००च्या वर खासदार होते; पण तेव्हा ते आरक्षण संपवून राज्यघटना बदलतील अशी भीती कोणीही व्यक्त केली नाही. यावर भाजप पुन्हा पुन्हा खुलासे करत आहे.
यंदाच्या निवडणुकीपूर्वीच काही उमेदवारांनी माघार घेतली
निवडणुकाच होऊ नयेत हे लोकशाहीत अजिबात योग्य नाही. या माघारी हेच दाखवतात की तुम्हाला आत्मविश्वास नाही. त्यामुळे असुरक्षितता आहे. निवडणुकीच्या काळात खाती गोठवणे, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे, आवाज दाबणे भारतातील लोकांना अजिबात आवडत नाही. जिंकणे किंवा हरणे वेगळे, निवडणुका होऊ न देणे हे एकतर कट आहे किंवा ते असुरक्षिततेचे दर्शक आहे.