हायलाइट्स:
- क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणाला गंभीर वळण
- राष्ट्रवादी, काँग्रेसचा भाजपवर निशाणा
- काँग्रेसने उपस्थित केले हे सवाल
मुंबईः मुंबईजवळ समुद्रात कॉर्डेलिया या क्रूझवरील रेव्ह पार्टी एनसीबीच्या टीमने उधळली होती. एनसीबीने केलेल्या कारवाईत शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आलं आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठं वादळ उठलं होतं आता या प्रकरणात राजकीय पक्षानंही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीदेखील काही सवाल उपस्थित केले आहेत.
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कोणतही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. सचिन सावंत यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. एनसीबी व भाजपमधील संगनमताची महाविकास आघाडी सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
आर्यन खानची अटक बोगस? भाजपचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या वेषात; ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट
‘खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर “पोलीस” पाटी कशी? एनसीबीने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का?,’ असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
‘मुंद्रा पोर्ट ड्रगसाठा प्रकरणातून लक्ष हटवणे हे लक्ष्य होते का? गोव्यात, सँडलवूड ड्रग रॅकेट व सुशांत सिंह प्रकरणात भाजपचे ड्रग कनेक्शन पाहिले आहे. देशाविरुद्ध हे गंभीर षडयंत्र आहे. तरुण पिढीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांचे आरोप गंभीर आहेत, चौकशी झाली पाहिजे,’ असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला विजय कसा मिळाला? ही कारणं ठरली महत्त्वाची