निवडणूक आयोगाकडून अहवाल प्रसिद्ध
लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान टक्केवारी बाबतचा अहवाल सादर केला आहे. आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार ६ व्या टप्प्यातील मतदान हे ५ व्या टप्प्यातील मतदानापेक्षा १.२ टक्के जास्त आहे. ही आकडेवारी ईव्हीएमद्वारे केलेल्या मतांवर आधारित आहे. या अहवालात पोस्टल मतपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला नाही.असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
कोणत्या राज्यात किती टक्के मते वाढली?
निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळपर्यंत व्होटर टर्नआउट ॲपवर अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, ओडिशामध्ये मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक ४.९० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर हरियाणामध्ये मतांची टक्केवारी ६०.४ टक्क्यांवरून ६४.८ टक्क्यांपर्यंत झाली. ओडिशात ६९.६ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये ७९.५ टक्क्यांवरून ८२.७ टक्क्यांपर्यंत आकडेवारी पोहोचली आहे. तर या पाठोपाठ झारखंडमध्ये सुमारे १.६ टक्के, बिहारमध्ये १.९ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ०.५ टक्के आणि दिल्लीत १ टक्के गुणांनी मतदानात वाढ झाली आहे.
२०१९ च्या तुलनेत दिल्लीत मतदानाची टक्केवारी कमी
दिल्लीमध्ये एकूण ५८.७ टक्के मतदान झाले. परंतु आता त्याची टक्केवारी वाढली असून ५७.७ टक्के इतकी झाली आहे. २०१९ च्या मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर २०१९ मध्ये ६०.६ टक्के मतदान झाले होते. या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदान कमी झाले आहे. त्यानंतर दक्षिण दिल्लीत ५६.४% मतदान झाले. उत्तर पश्चिम दिल्लीत ५७.८ टक्के, चांदणी चौकात ५८.६ टक्के, पश्चिम दिल्लीत ५८.८ टक्के तर पूर्व दिल्लीत ५९.५ टक्के मतदान झाले.
मतदानाची टक्केवारी कशी मोजली जाते ?
मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगकडून व्होटर टर्नआउट ॲपद्वारे मताची टक्केवारी दर्शवली जाते. त्याबाबतच्या अपडेट्स सातत्याने दिल्या जातात. त्यावरून किती टक्के मतदान झालं याची माहिती मिळत असते.