शेतकरी वाऱ्यावर पडलाय का? मोगलाई आहे का?; अजित पवार भडकले!

हायलाइट्स:

  • लखीमपूर येथील हिंसाचारावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
  • शेतकरी वाऱ्यावर पडलाय का?; अजित पवारांचा सवाल
  • महाराष्ट्र बंद हा शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधासाठी – पवार

मुंबई: ‘उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur Kheri Violence) इथं शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेली घटना भयंकर आहे. आपल्या देशात असं कधीच झालं नव्हतं. शेतकरी वाऱ्यावर पडलाय का? ही मोगलाई आहे का?,’ असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भारतीय जनता पक्षावर जोरदार तोफ डागली.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथं शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेबद्दल बोलताना त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘गेले कित्येक महिने देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. लोकशाहीत चर्चा करून मार्ग काढता येतो. मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेलेली नाही. मार्ग काढला जात नाही. असं असताना कुणीतरी गाडी घेऊन जातो काय आणि शेतकऱ्यांना चिरडतो काय, शेतकरी काय उघड्यावर पडलाय का?,’ असा संतप्त सवाल त्यांनी केला.

झेडपी निकाल: अजित पवार म्हणाले, सगळ्या जागांवर एकत्र लढलो नव्हतो!

‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूनं आहोत. कायदा हा सगळ्यांना सारखा असला पाहिजे. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून ११ ऑक्टोबर रोजी आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यात सहभागी होतील,’ असं अजित पवार यांनी सांगितलं.

राज्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळेल!

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्या दृष्टीनं पंचनामे सुरू आहेत. पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यात लक्ष ठेवून आहेत. केंद्र सरकारनंही त्या कामी सहकार्य करायला हवं. कोल्हापूरमधील पुराची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक अडीच महिन्यांनंतर आलं आहे. इतक्या उशिरा पाहणी करून नेमकी परिस्थिती कशी कळणार? इतक्या दिवसांनंतर चित्र बदलतं. अडीच महिने आम्ही तसंच बसायचं का, असं शेतकरी केंद्रीय पथकाला विचारत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना तातडीनं सहकार्य करण्याची राज्याची भूमिका आहे. राज्याची यंत्रणा युद्धपातळीवर काम करतेय. मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत,’ असं अजित पवार म्हणाले.

वाचा: करोना संकट कायमचं जाऊ दे; मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना

Source link

ajit pawar news todayAjit Pawar on Lakhimpur Violenceउत्तर प्रदेशलखीमपूरलखीमपूर हिंसाचार
Comments (0)
Add Comment