लोकसभा निवडणुकीचा अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपला, महाराष्ट्र-बिहारबाबत भाजपला धाकधूक कायम

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच १६ मार्चपासून देशभरात धडाडणाऱ्या निवडणुक प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी ५ वाजता सातव्या टप्प्याच्या प्रचाराच्या सांगतेबरोबरच थंडावल्या. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवारी (१ जून) रोजी ८ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात पंजाब, हिमाचल प्रदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीचाही समावेश आहे.

२०१९ मध्ये या ५७ जागांपैकी भाजपप्रणित एनडीएने ३२ तर तत्कालीन यूपीएने केवळ ९ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागा इतर पक्षांनी जिंकल्या होत्या. सध्या एनडीए व इंडिया या दोन्ही आघाड्यांनी या वेळी आपली पूर्ण ताकद लावली आहे. पंजाबमध्ये आप, भाजप, काँग्रेस आणि अकाली दल यातील प्रत्येकजण यंदा स्वतंत्र निवडणुका लढवत आहे.
सध्याच्या सरकारला आणखी एक संधी मिळाली, तर…; निकालाच्या आधी मल्लिकार्जुन खर्गे मोठे वक्तव्य

७५ दिवसांत पंतप्रधान मोदींच्या १७२ जाहीर सभा

प्रदीर्घ सात टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या ७५ दिवसांत पंतप्रधान मोदींनी किमान १७२ जाहीर सभा आणि रोड शो केले. अमित शहा यांनी सुमारे २२१ सभा आणि रोड शो केले. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी १३४ सभा घेतल्या.

तर विरोधकांत राहुल गांधींनी सर्वाधिक किमान १०७ सभा आणि रोड शो केले. अखिलेश यादव यांनी ६९ सभा आणि ४ रोड शो केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ६२ सभा आणि अनेक रोड शो केले. प्रियांका गांधी यांनी सर्वाधिक सभा, रोड शो आणि माध्यमांशी संवाद साधला आहे. प्रियंका गांधी यांनी १४० हून अधिक रॅली आणि रोड शो केले. १०० बाइट्स/टिकटॅक्स आणि मुलाखती दिल्या. तसेच ५ वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या.
‘वास्तव’ हाती आले हो, सगळेच अवघड झाले हो! राज्यात वाढली भाजपची चिंता; विधानसभेतही फटका?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १०० हून अधिक रॅली, २० हून अधिक पत्रकार परिषदा आणि ५० हून अधिक मुलाखती दिल्या. खर्गे यांनी गुरुवारच्या अखेरच्या निवडणूक पत्रकार परिषदेतही येत्या ४ जूनच्या संदर्भात इंडिया च्या विजयाचा ठाम दावा केला. इंडिया आघाडी पूर्ण बहुमताने देशात सरकार स्थापन करेल व आमचे सरकार सर्वसमावेशक, राष्ट्रवादी आणि विकासाच्या मुद्द्यांवर चालेल असे खर्गे म्हणाले.
प्रशांत किशोरांच्या लोकसभा अंदाजापेक्षा योगेंद्र यादवांचा अंदाज वेगळा, भाजपचे टेन्शन वाढणार?

महाराष्ट्र, बिहारबाबत भाजपला धाकधूक कायम

प्रचार संपल्यानंतर भाजप नेतृत्वाने आपल्या कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा व वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी रात्री दीर्घकाळ बैठक चालल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ज्या राज्यांमध्ये भाजप आघाडीस नुकसान होऊ शकते असा भाजपचा अंदाज आहे त्यात महाराष्ट्र आणि बिहारची नावे अतिशय ठळकपणे घेतली जात आहेत.
महायुतीत खटपट विधानसभेच्या जागावाटपाची; फडणवीसांची आवडती टर्म ठरणार महत्त्वाची; सूत्र काय?

राजस्थान आणि कर्नाटकमध्ये २०१९ च्या तुलनेत भाजपच्या काही जागा कमी असू शकतात. कर्नाटकात भाजपने गेल्या वेळी २५ जागा तर महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विशेषतः महाराष्ट्रात काही जागांवर मित्रपक्षांचे जास्त नुकसान होऊ शकते असा भाजपचा फीडबॅक आहे.

भाजपला २०१९ च्या तुलनेत ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे. याच राज्यांमध्ये लोकसभेच्या २४४ जागा आहेत व गेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी यापैकी ९४ जागा जिंकल्या होत्या.

Source link

lok sabha electionlok sabha election 2024Lok Sabha Election 2024 resultsLok Sabha Election Campaign ConcludesLok Sabha Election resultsलोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४सातव्या टप्प्यातील प्रचार संपला
Comments (0)
Add Comment