Loksabha Election: प्रचारतोफा थंडावल्या; आठ राज्यांत ५७ जागांसाठी उद्या मतदान, कुणामध्ये होणार लढत?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच १६ मार्चपासून देशभरात धडाडणाऱ्या निवडणुक प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सातव्या टप्प्याच्या प्रचाराच्या सांगतेबरोबरच थंडावल्या. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या, शनिवारी आठ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात पंजाब, हिमाचल प्रदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश आहे.

२०१९मध्ये या ५७ जागांपैकी भाजपप्रणित ‘एनडीए’ने ३२, तर तत्कालीन ‘यूपीए’ने केवळ नऊ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागांवर अन्य पक्षांनी विजय मिळवला होता. ‘एनडीए’ व ‘इंडिया’ या दोन्ही आघाड्यांनी यावेळी पूर्ण ताकद लावली आहे. पंजाबमध्ये आप, भाजप, काँग्रेस आणि अकाली दल यातील प्रत्येकजण यंदा स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.

अशा झाल्या सभा
प्रदीर्घ सात टप्प्यांतील निवडणूक प्रचाराच्या ७५ दिवसांत पंतप्रधान मोदींनी किमान १७२ जाहीर सभा आणि ‘रोड शो’ केले. अमित शहा यांनी सुमारे २२१ सभा व रोड शो केले. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १३४ सभा घेतल्या. विरोधकांत राहुल गांधींनी सर्वाधिक किमान १०७ सभा आणि ‘रोड शो’ केले. अखिलेश यादव यांनी ६९ सभा व चार रोड शो केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ६२ सभा आणि अनेक ‘रोड शो’ केले. प्रियांका गांधी यांनी सर्वाधिक सभा, रोड शो आणि माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी १४०हून अधिक रॅली आणि ‘रोड शो’ केले. १०० बाइट/टिकटॉक आणि मुलाखती दिल्या; तसेच पाच वृत्तपत्रांना दीर्घ मुलाखती दिल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १००हून अधिक रॅली, २०हून अधिक पत्रकार परिषदा आणि ५०हून अधिक मुलाखती दिल्या. त्यांनी गुरुवारच्या अखेरच्या निवडणूक पत्रकार परिषदेतही येत्या चार जूनच्या संदर्भात ‘इंडिया’च्या विजयाचा ठाम दावा केला.

महाराष्ट्र, बिहारबाबत धाकधूक कायम
प्रचार संपल्यानंतर भाजप नेतृत्वाने आपल्या कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा व वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी रात्री दीर्घकाळ बैठक चालल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ज्या राज्यांमध्ये भाजप आघाडीस नुकसानीची शक्यत आहे, त्यात महाराष्ट्र आणि बिहारची नावे अतिशय ठळकपणे घेतली जात आहेत. राजस्थान आणि कर्नाटकमध्ये २०१९च्या तुलनेत भाजपच्या काही जागा कमी असू शकतात. कर्नाटकात भाजपने गेल्या वेळी २५, तर महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. या वेळी विशेषतः महाराष्ट्रात काही जागांवर मित्रपक्षांचे जास्त नुकसान होऊ शकते असा भाजपचा ‘फीडबॅक’ आहे. भाजपला २०१९च्या तुलनेत ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे. याच राज्यांमध्ये लोकसभेच्या २४४ जागा आहेत व गेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी यापैकी ९४ जागा जिंकल्या होत्या.

पंतप्रधानांची ध्यानधारणा सुरू
कन्याकुमारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद शीलास्मारकावरील ४५ तासांच्या ध्यानधारणेला सुरुवात केली. तिरुअनंतपुरमहून हेलिकॉप्टरने कन्याकुमारीत दाखल झाल्यानंतर, मोदींनी भगवती अम्मा मंदिरात पूजा केली आणि बोटीने शीलास्मारक गाठले. त्यांची ध्यानधारणा एक जूनपर्यंत चालणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या स्मारकात पंतप्रधान प्रथमच मुक्काम करणार आहेत.

५७
सातव्या टप्प्यातील मतदारसंघ


मतदान होणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेश

९०४
रिंगणातील उमेदवार
राज्ये आणि मतदारसंघ

१३
उत्तर प्रदेश

१३
पंजाब


बिहार


पश्चिम बंगाल


चंडीगड


हिमाचल प्रदेश


ओडिशा


झारखंड

लक्षवेधी लढती
पंतप्रधान नरेंद्र मोदी
अजय राय
वाराणसी

रविकिशन (भाजप)
रामभुअल निषाद (समाजवादी पक्ष)
गोरखपूर (उत्तर प्रदेश)

कंगना रनोट (भाजप)
विक्रमादित्यसिंह (काँग्रेस)
मंडी (हिमाचल प्रदेश)

मिसा भारती (आरजेडी)
राम कृपाल यादव (भाजप)
पाटलीपुत्र (बिहार)

अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)
अभिजित दास (भाजप)
डायमंड हार्बर (पश्चिम बंगाल)

चरणजितसिंग चन्नी (काँग्रेस)
पवनकुमार टिनू (आप)
जालंधर (पंजाब)

हरसिमरतकौर बादल (अकाली दल)
परमपाल कौर सिद्धू (भाजप)
भटिंडा (पंजाब)

रविशंकर प्रसाद (भाजप)
अंशुल अविजित (काँग्रेस)
पाटणासाहिब (बिहार)

Source link

indialok sabha elections 2024Lok Sabha Elections 2024 Phase 7NDAPM Modi
Comments (0)
Add Comment