पंजाबच्या होशियारपूरमध्ये उमेदवार अनिता प्रकाश यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडणार होती. रविदासिया आणि वाल्मिकी समाजाची मोठी लोकसंख्या असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात १ जूनला मतदान पार पडणार आहे. याआधी मोदींची शेवटची सभा होशियारपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर लँड होण्याआधीच सदर घटना घडली.
ही घटना प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी जेसीबीच्या मदतीने हेलीपॅडपासून जवळपास २ किलोमीटर अंतरावर मोठा खड्डा खणला. आणि कालव्यातून येणाऱ्या पाण्याला रोखलं. पण प्रशासनाचा कडक बंदोबस्त असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत ही चूक झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घडले असे की, पंतप्रधानांची जाहीर सभा ज्याठिकाणी पार पडणार होती, त्या सभास्थळापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावार कंडी कनाल कालव्याचा प्रवाह बाहेर पडतो. याच कालव्याचे दार कोणीतरी उघडले होते. दार उघडताच पाणी हेलिपॅडच्या दिशेने पुढे वाहत होते. यानंतर तातडीने होशियारपूर पोलीस अधिकाऱ्याने कालवा विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावरुन आता राजकारण देखील तापलेले पाहायला मिळत आहे. कोणीतरी जाणूनबुजून हे कृत्य केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पंतप्रधानांची जाहीर सभा रोखली जावी यासाठी या कालव्याचे पाणी सोडले गेले आणि ही सभा तर उधळून लावण्याचा सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप पंजाबमधील भाजपा नेते तीक्ष्ण सूद यांनी केला आहे.
दरम्यान पंजाबमध्ये १ जूनला मतदान पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्यात १३ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. गत निवडणुकीत काँग्रेसने येथून १३ पैकी ८ जागांवर विजय मिळवला होता. भाजप आणि अकाली दलाला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पक्षाने एक जागा जिंकली होती.