एक्झिट पोल म्हणजे काय ?
खरं तर ‘एक्झिट’ या शब्दाचा मराठीत अर्थ हा ‘बाहेर पडणे’ असा होतो. जेव्हा मतदार आपलं मत देऊन मतदानकेंद्रामधून बाहेर पडत असतो, तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यासाठी एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभं करतात आणि तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं ? तुमच्या मनातील पंतप्रधान कोण? कोणाचे सरकार येईल? अशा प्रकारचे प्रश्न मतदारांना विचारले जातात. आणि मतदारांकडून उत्तराचे व माहितीचे योग्यरित्या विश्लेषण करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधला जातो.
तर सी व्होटर, अॅक्सिस माय इंडिया, सीएनएक्स भारत या एक्झिट पोल्स करणाऱ्या काही प्रमुख संस्था आहेत. यांच्यामार्फत एक्झिट पोल तयार केला जातो.
एक्झिट पोलचे नियम आणि कायदे
एक्झिट पोल संदर्भात रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्ट १९५१ चा सेक्शन( १२६ A)हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोल्ससाठी काही नियम आखण्यात आले आहेत. निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम किंवा प्रभाव पडू नये, यासाठी हे नियम असतात.
एक्झिट पोल सादर करण्यासाठी आयोगाची परवानगी गरजेची
केंद्रीय निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोल्ससाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो. यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत, असा नियम आहे. शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपून अर्धा तास होईपर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत. तसेच एक्झिट पोल सादर करण्यासाठी संबंधित संस्थांना निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
भारतात पहिला एक्झिट पोल १९५७ मध्ये झाला
दरम्यान १९५७ च्या दुसऱ्या सार्वजनिक निवडणुकांदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने भारतात पहिल्यांदा एक्झिट पोल सादर केला होता. त्यानंतर १९८० व १९८४ या साली डॉक्टर प्रणय रॉय यांनी पहिल्यांदा एक्झिट पोल केला होता.