देशातील पहिल्या एआय आधारित एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी एनडीएला ३०५ ते ३१५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला १८० ते १९५ जागांवर यश मिळू शकतं. एआय आधारित एक्झिट पोलसाठी झी न्यूजनं तब्बल १० कोटींच्या सॅम्पल साईजचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे. या सर्व्हेनुसार अन्य पक्षांना ३८ ते ५२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
कसा झाला सर्व्हे?
झी न्यूजनं इंडिया कन्सोलिडेटेडच्या मदतीनं केलेल्या एआय सर्वेक्षणासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरील कमेंट्सचा अल्गोरिदमद्वारे आढावा घेण्यात आला. कमेंट्स करणाऱ्या यूजर्ससाठी निकष लावण्यात आले. हे सर्व यूजर्स १८ वर्षांवरील, स्थानिक मतदारसंघातील असल्याची खात्री करण्यात आली होती. फेसबुकवरील ३२ लाख पोस्ट, हजारो उमेदवारांचे सोशल मीडिया प्रोफाईल, त्यावरील १० कोटी कमेंट्सचं विश्लेषण करण्यात आलं होतं.
अनेक राज्यांतील आकडेवारीत तफावत
विविध संस्थांच्या आणि एआय एक्झिट पोलमध्ये काही राज्यांच्या अंदाजात बरीच तफावत असल्याचं दिसतं. उत्तर प्रदेशात एनडीएला ८० पैकी ६५ ते ७० जागा मिळतील, तर इंडियाला ८ ते १० जागा मिळतील असे अंदाज बऱ्याच संस्थांनी वर्तवले आहेत. पण एआयच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ५२ ते ५८, तर इंडियाला २२ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. बिहारमध्ये सर्वच संस्थांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये २९ ते ३३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली. इंडियाला ७ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. एआय पोलमध्ये मात्र दोन्ही पक्षांना १५ ते १५ जागा मिळू शकतात.
पाच देशांमध्ये वापर, अचूकता ८० टक्के
एआय एक्झिट पोलचा वापर याआधी अमेरिका, अर्जेंटिना, मेक्सिको, ब्राझील आणि सायप्रसमध्ये झाला आहे. या पोलची अचूकता ८० टक्के असल्याचा दावा करण्यात येतो.