Chipi Airport: फडणवीसांना आमंत्रण का नाही? सुभाष देसाईंच्या घरचा कार्यक्रम आहे का?; राणे भडकले

हायलाइट्स:

  • सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन
  • नारायण राणे यांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषद
  • फडणवीसांना आमंत्रण नसल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

मुंबई: सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा उद्घाटन (chipi airport inauguration) सोहळा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे देखील सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. मात्र, उद्घाटन सोहळ्यापूर्वीच पुन्हा एकदा श्रेयाचा वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सोहळ्याचं आमंत्रण नसल्याच्या कारणावरूनही राणेंनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. याबाबत नारायण राणेंना विचारलं असता, आयोजकांनी हा निर्णय का घेतला मला माहीत नाही. राज्यात कुठल्याही नव्या प्रकल्पाचं उद्घाटन होत असेल तर विरोधी पक्षनेत्याला निमंत्रण द्यायला हवं. याबाबत कुठलाही नियम नसला तरी काही प्रथा-परंपरा असतात. प्रथा, परंपरांना कायद्याइतकंच महत्त्व असतं. जे काही राज्यातल्या सरकारनं केलंय ते चुकीचं आहे. हा काही उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या घरचा कार्यक्रम नाही. मुलाचं लग्न नाही. फडणवीसांना आमंत्रण द्यायला हवं होतं. ही संकुचित वृत्ती आहे,’ असं राणे म्हणाले. ‘अशा चुकांना कायद्यांना काही शिक्षा नाही. पण लोकांना यांची नियत कळली,’ असा टोला राणेंनी हाणला.

वाचा: हा माणूसही त्यातलाच! समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचा थेट हल्लाबोल

‘फडणवीस यांच्याशी मी या संदर्भात बोललो. मात्र, या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये असं ते म्हणाले. सिंधुदुर्गाच्या आणि राज्याच्या हिताचं काम होतंय ते महत्त्वाचं आहे, असं ते मला म्हणाले. ते सहनशील आहेत. त्यांच्या जागी मी असतो तर चित्र वेगळं असतं,’ असा इशाराही राणेंनी दिला.

शिवसेनेचं आहेच काय?

चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेना घेत असल्याचं राणेंच्या निदर्शनास आणून दिलं असता ते म्हणाले, ‘शिवसेना या कामाचं श्रेय घेऊच शकत नाही. त्यांनी इथं काही काम केलेलंच नाही. एमआयडीसी राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, म्हणून कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलंय. या पलीकडं त्यांचा कशाशीही संबंध नाही,’ असं राणेंनी शिवसेनेला सुनावलं. खासदार विनायक राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. विनायक राऊतांना कोकणातल्या गावात कुणी ओळखतही नाही, असं राणे म्हणाले.

वाचा: ‘महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधी झुकला नाही आणि झुकणार नाही’

Source link

chipi airport inaugurationDevendra FadnavisNarayan Rane Attacks Subhash Desaiचिपी विमानतळ उद्घाटननारायण राणेसुभाष देसाई
Comments (0)
Add Comment