आठवड्याच्या शेवटी नितीश कुमार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. भाजपा बहुमताच्या तुलनेत कमी पडल्याने आता नितीश कुमार किंगमेकर ठरु शकतात.
शरद पवारांचा नितीश कुमारांना फोन
नितीश कुमार हे एनडीएची साथ सोडतील अशी चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडी नितीश कुमार यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांकडून समजते. निकाल जाहीर होताच शरद पवार यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. नितीश कुमार बाजू बदलतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जेडीयुने हे नाकारलं आहे. पण, खासदार मनोज झा यांनी तेजस्वी यांच्या त्या विधानाची परत आठवण करुन दिली ज्यात ते म्हणाले होते की, नितीश कुमार ४ जूननंतर पुन्हा खेळी करु शकतात.
नितीश कुमार एनडीएसोबतच राहतील असं जेडीयुच्या विश्वस्त सूत्रांनी सांगितलं आहे. २०२४ च्या मोदी सरकारमध्ये नितीश कुमार यांना पक्षासाठी अधिक मंत्रीपदांची अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
नितीश कुमार केंद्रात तीन मंत्रिपद मागू शकतात, ते एका मंत्रिपदावर सेटल होण्याची शक्यता फार कमी असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते आणि चंद्राबाबू नायडू हे ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असतील, त्यामुळे नितीश कुमार भाजपकडे हवी ती डिमांड करु शकतात.