मध्यमवयीन आरोपी सुप्रभा गोआला हिला कोविड महामारीच्या काळात तिच्या पतीने सोडून दिले होते. ती तिचा एकुलता एक मुलगा राजदीप याच्यासोबत जॉयनगर येथील वसाहतीत राहते. त्यांच्या मोठ्या मुलीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. बांधकाम साईट्सवर सहाय्यक म्हणून काम करून सुप्रभा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावते.
सुप्रभाला मंगळवारी आगरतळा येथील नगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिला आदल्या रात्री जॉयनगरमधून अटक करण्यात आली होती. सुप्रभाने न्यायालयासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपला मुलगा राजदीप गोआलाच्या अनियंत्रित वागणुकीमुळे त्याचा गळा दाबून खून केल्याचे तिने सांगितले.
दरम्यान तिने स्वेच्छेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण देखील केले आणि तिच्या कृत्यासाठी कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
सुप्रभाने आपल्या जबाबात सांगितले की, ‘राजदीपच्या चुकीच्या वागणुकीमुळे आणि खोडकर कृत्यांमुळे मला दररोज माझे रोजंदारीचे काम गमवावे लागत आहे. मी जर त्याला घरी एकटे सोडले तर तो ड्रग रॅकेट आणि चोरीच्या प्रकारात अडकत होता. तसेत मी त्याला माझ्यासोबत कामाच्या ठिकाणी नेले तर तो माझा दिवस खराब करत होता. परिणामी ठेकेदाराने मला कामावरून काढून टाकले, माझ्या मुलामुळे मी किमान चार नोकऱ्या गमावल्या आहेत, ज्यामुळे आमच्याकडे खायला अन्न शिल्लक नव्हते.”
तिने पुढे स्पष्ट केले की, तिच्या अनुपस्थितीत राजदीपला पैसे चोरण्याची सवय लागली होती. अलीकडे, जेव्हा तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो गर्विष्ठ बनला होता, शिवीगाळ देखीव करू लागला आणि त्याच्या गोष्टींना नकार दिल्याने मारहाणही केली, ‘मला माझ्या आयुष्याबद्दल असुरक्षित वाटू लागले कारण तो हिंसक झाला होता.’
‘कोणताही पर्याय समोर दिसत नसल्याने, रोजच्या त्रासातून सुटका मिळावी म्हणून मी त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला. कामावरून घरी परतल्यानंतर मी संध्याकाळी एक दोरीचा फास तयार केला. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी त्याच्यावर उडी मारली इतक्यात मी दोरी त्याच्या गळ्यात टाकली आणि त्याची हालचाल थांबेपर्यंत गळा आवळला. त्याच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर माझ्या अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे मी शेजाऱ्यांना कळवले आणि पोलिसांना बोलवायला सांगितले. ‘मला आता जगायचे नाही, कारण माझी एकमेव आशा मारली गेली आहे. मी आता माझा मृत्यूदंड शोधत आहे,’ अशी कळवळीची प्रार्थना सुप्रभाने न्यायालयासमोर केली.