भाजप अध्यक्ष पदासाठी महासचिव विनोद तावडेंचं आघाडीवर असताना आता या स्पर्धेत बिहारच्या पूर्व चंपारण्यचे खासदार राधा मोहन सिंह यांच्या नावाची एन्ट्री झाली आहे. सिंह यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद जाऊ शकतं असं वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारमध्ये बिहारमधून आठ मंत्री आहेत. पण यामध्ये राजपूत समाजातील एकाचाही समावेश नाही. त्यामुळे बिहारच्या राजपूत समाजात नाराजी आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाविषयी केलेल्या विधानानं वाद निर्माण झाला. गुजरातमध्ये राजपूत समाजानं आंदोलनं केली. याचा फटका उत्तर प्रदेश, राजस्थानात पक्षाला बसला. राजपूत समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राधा मोहन सिंह यांच्याकडे भाजपचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं.
भाजपचा नवा अध्यक्ष निवडण्याचे अधिकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देण्यात आले आहेत. राधा मोहन सिंह संघाचे निकटवर्तीय मानले जातात. मोदी केंद्रात पहिल्यांदा सत्तेत आल्यावर सिंह यांच्याकडे कृषिमंत्रीपद देण्यात आलं होतं. जमिनीवरचे नेते अशी त्यांची बिहारमधील ओळख आहे. संघटनात्मक बांधणीत ते निष्णात आहेत. संघटन विस्तारात त्यांचा हातखंडा आहे.
तावडेंची बिहारमध्ये दमदार कामगिरी
लोकसभा निवडणुकीत विनोद तावडेंकडे बिहारचा प्रभार होता. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नितीश कुमारांना एनडीएमध्ये आणलं. जेडीयू, भाजप युती घडवून आणली. त्याचा परिणाम लोकसभेत दिसला. राज्यात एनडीएनं ३० जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशसारखं नुकसान बिहारमध्ये होण्याची शक्यता होती. पण जेडीयूला एनडीएमध्ये आणत तावडेंनी चाणाक्ष खेळी केली. निवडणूक निकालानंतर जेडीयूच भाजपसाठी किंगमेकर ठरला.