पित्रोदा एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, ‘मी इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, आयटी, सॉफ्टवेअर, कॉम्प्लेक्स प्रणाली अशा अनेक आघाड्यांवर सुमारे ६० वर्षे काम केले आहे. मी ईव्हीएम प्रणालीचा बारकाईने अभ्यास केला आहे आणि मला विश्वास आहे की यात फेरफार करणे शक्य आहे.’
प्रसिद्ध दूरसंचार तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनी गेल्याच महिन्यात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात,’ असे विधान केल्यानंतर पित्रोदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या वादानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
एलॉन मस्क यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल आपली चिंता व्यक्त केली आणि असे देखील सुचवले की, ईव्हीएम हॅक होण्याचा धोका जरी कमी असला तरी हे यंत्र मानवनिर्मित किंवा एआयद्वारे होणाऱ्या हॅकिंगच्या जोखमीतून दूर केले जावे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मस्क यांच्या ईव्हीएम बद्दलच्या चिंतेला दुजोरा दिला. त्यांनी चेतावणी दिली की, भारतील निवडणूक यंत्रणा जबाबदारी घेण्यासाठी टाळाटाळ करतात, त्यामुळे लोकशाही ही फक्त दर्शनी बाब बनली आहे, ज्यामुळे फसवणूकीला आणखी वाव मिळतो.
मस्क यांच्या पोस्टला उत्तर देताना, निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, भारताच्या EVM प्रणालीची पद्धतीशीर हाताळणी आणि सार्वजनिक मान्यतेच्या बाजूने अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने देखील महत्वाची निरीक्षणं मांडली आहेत. तरीही एलॉन मस्कने अशी पोस्ट करुन प्रश्न उपस्थित करणं हे चिंतादायक आहे.
निवडणूक आयोग प्रतिनिधीने असे देखील निदर्शनास आणून दिले की, अमेरिकेमधील राज्ये त्यांच्या मतदानाच्या पद्धती निवडू शकतात, ज्यात कागदी मतपत्रिकांपासून थेट रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक (DRE) प्रणालीचा देखील समावेश होतो. यामध्ये पेपर ट्रेल्ससह किंवा त्याशिवाय देखील नागरिक मतदान करु शकतात.
विरोधी पक्ष काही दिवसांपासून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी व्हीव्हीपॅट स्लीपच्या १०० टक्के मोजणीची मागणी देखील केली होती, परंतु ही विनंती सध्या मान्य करण्यात आलेली नाही, असे निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीने नमूद केले आहे.