‘बंद करायचं शिवसेनेच्या मनात नव्हतं, पण पवारांचा निर्णय असल्यानं नाईलाज झाला’

कोल्हापूर: ‘ज्यांच्या हातात राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी आहे, त्याच पक्षाचे नेते हातात दंडुके घेऊन बंद करा असे आवाहन करत आहेत. तरीही महाराष्ट्र बंदला (Maharashtra Bandh) लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही, हा बंद फसला आहे,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला.

कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘लखीमपूरमध्ये जी घटना घडली, ती नक्कीच अमानवी आणि दुर्दैवी आहे. त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री याचा मुलगा असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्याला अटक झाली आहे. त्याच्यावर कारवाई होईल. पण त्या घटनेचा संबंध जोडून महाराष्ट्र बंद करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असं पाटील म्हणाले.

वाचा: बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचं खुलं आव्हान

‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून वादळ आणि महापुरामुळे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त जनतेला अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. उपमुख्यमंत्री म्हणतात, वेळ आल्यावर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढू. वेळ कधीच निघून गेली आहे, आता कर्ज काढा असा टोला मारून पाटील म्हणाले, गेल्या पाच-सहा दिवसांत ज्या आयकराच्या धाडी पडत आहेत, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठीच बंदचा राजकीय स्टंट करण्यात आला आहे. हा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे. लोकांच्या परवानगीशिवाय बंद करू नये असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तरीही ज्या घटनेशी महाराष्ट्राचा काही संबंध नाही. ज्या घटनेशी भाजप, उत्तर प्रदेशातील राज्य सरकार किंवा केंद्र सरकार याचा काडीमात्र संबंध नाही, तरीही भाजपवर आरोप करत बंद पाळला जात आहे.’

वाचा: शेतकऱ्यांच्या हत्येला मनसेचा पाठिंंबा आहे का?; राष्ट्रवादीचा रोकडा सवाल

‘कोल्हापुरातील एका महान नेत्याने शिवसेना स्टाइलने बंद करा असे आवाहन शिवसेनेला केले. महाविकास आघाडीतील या नेत्याच्या या आवाहनानुसार त्यांच्या पक्षाची ताकद जिल्ह्यात नाही हे स्पष्ट होते. शिवसेनेच्या जिवावर हे मोठे होत आहेत, या पक्षाचा समाजात धाक नाही, सोबत जनसमुदाय नाही, त्यामुळे शिवसेनेच्या बळावर हे पक्ष मोठे होत आहेत. याची कल्पनाही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत, तेथे राज्य सरकार संवेदनशील नाही. मात्र लखीमपूर प्रकरणात संवेदनशीलता दाखवत राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाचा: ‘पोलीसच दुकानं बंद करायला सांगताहेत, ही कुठली पद्धत? हे कुठलं राज्य?’

हा बंद नेमका कुणाचा, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘बंदची हाक प्रथम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली. बंदमध्ये सहभागी होण्याचे शिवसेनेच्या मनात नव्हतं, पण पवारांनी हाक दिल्यामुळं शेवटच्या क्षणी त्यांनी बंदला पाठिंबा दिला आणि त्यात सक्रिय सहभाग नोंदवला. अनेकदा पवार निर्णय घेतात आणि शिवसेनेला त्यांच्यासोबत फरफटत जावं लागतं, असा टोलाही पाटील यांनी हाणला.

Source link

Chandrakant Patil on Maharashtra Bandhकोल्हापूरचंद्रकांत पाटीलमहाराष्ट्र बंदमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment