पूल बनवताना निकृष्ट दर्जाची सामग्री वापरल्याने हा पूल पडला असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच या पुलाकडे जाण्याचा अप्रोच कट झाल्याने मार्ग पूर्ववत करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू झाले, मात्र त्यापूर्वीच पूल कोसळला. तर येथील स्थानिक आमदार विजय कुमार मंडल यांचे म्हणणे आहे की, ‘यापूर्वी याठिकाणी पूल बांधण्यात आला तेव्हा पुरामुळे नदीचे पात्र वाहून गेले होते. यानंतर १२ कोटी रुपये खर्चून नदीपात्रापर्यंत पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. मात्र विभागातील लोकांनी लक्ष न दिल्याने ठेकेदाराने योग्य काम केले नाही.’
१८२ मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम २०२१ मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून निधीची तरतूद करण्यात आली होती. २०२२ पर्यंत पूल बांधून पूर्ण होणार असल्याचा अंदाज होता, परंतु पूलाचे काम जून २०२३ मध्ये पूर्णत्वास आले.
सदर पूलाचे काम ग्रामीण बांधकाम विभागांतर्गत शेजारील किशनगंज जिल्ह्यातील ठेकेदाराला देण्यात आले होते. एकूण बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे त्यावरून रहदारी सुरु नव्हती. पण गेल्या दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबला भेगा पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यातच मंगळवारी हा पूल अचानक कोसळला आहे.
यापूर्वीही बिहारमधील महत्वाकांक्षी प्रकल्प मानले जाणारे पूल कोसळले होते. गतवर्षीच्या जूनमध्ये भागलपूर आणि खगडीयाला जोडणारा अगुआनी-सुलतानगंज पूल कोसळला. तर सप्टेंबर मध्ये बांकामधील जिलानीपथ येथील खेसर-तारापूर मुख्य रस्त्यावरील बहोर्णा गावानजीकच्या लोहगर नदीवरील बांधलेला पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीत सामावून गेला होता. ज्यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता.