हायलाइट्स:
- अमृता फडणवीसांना रुपाली चाकणकरांचं जोरदार प्रत्युत्तर
- ‘महाराष्ट्र बंद’वरून अमृता यांनी केली होती आघाडीवर टीका
मुंबई: लखीमपूर खेरी इथल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’वरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सध्या जोरदार जुंपली आहे. बंद यशस्वी झाल्याचा दावा सत्ताधारी पक्षांनी केला आहे तर, बंद फसल्याचं भाजपचं म्हणणं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आजच्या बंदच्या निमित्तानं आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
बंदचं आवाहन करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते, आमदार आज रस्त्यावर उतरले होते. ही संधी साधून अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘आज वसुली चालू आहे की बंद? कोणी मला माहिती देईल का?,’ असं खोचक ट्वीट त्यांनी केलं होतं. ‘महाराष्ट्र बंद नही है’ असा हॅशटॅगही त्यांनी सोबत टाकला आहे. त्यांच्या या ट्वीटची चर्चा रंगली होती.
वाचा: संपूर्ण महाराष्ट्रात महाआघाडी एकदिलाने रस्त्यावर उतरली, ‘या’ शहरात मात्र…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता यांना उत्तर दिलं होतं. ‘वसुलीमध्ये कोण पुढं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. देशपातळीवर आणि ज्या ज्या राज्यांत भाजपचं सरकार आहे, त्या ठिकाणी वसुलीबाबत त्यांना (अमृता फडणवीस) माहिती आहे. म्हणूनच त्यांनी असं ट्वीट केलं असावं,’ असा चिमटा पटोले यांनी काढला होता. पटोले यांच्यानंतर आता रुपाली चाकणकरांनी अमृता फडणवीसांना त्यांच्याच स्टाइलनं उत्तर दिलं आहे.
‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसाच त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो. संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी,’ अशी शेलकी टीका चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. चाकणकरांचं हे ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
वाचा: ‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’