निवडणूक सुरू असताना आणि निकालानंतर अनेक भागात भाजप कार्यकर्त्यांना घर सोडून आसरा शोधावा लागला होता. भाजपच्या चार जणांच्या केंद्रीय समितीने दक्षिण २४ परगणा जिल्ह्याला मंगळवारी भेट दिली. यावेळी आमताला येथे समितीच्या वाहन ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांकडूनच रोखण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपली कैफियत ऐकविली.
केंद्रीय समितीमध्ये त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव, ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, राज्यसभा खासदार ब्रिजलाल आणि कविता पाटिदार यांचा समावेश आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात असलेल्या कूंचबिहार लोकसभा मतदारसंघाला भेट दिली. या मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीश प्रामाणिक यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. निवडणूक निकालानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.
निवडणूक निकालानंतर हिंसाचार घडविणे ही तृणमूल काँग्रेसची जुनी सवयच आहे. ‘तृणमूल’ने विरोधी पक्षांसोबत वागणुकीच्या या आपल्या भूमिकेत बदल केला तर अधिक चांगले होईल – बिप्लबकुमार देव, भाजप नेते
भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांचा निषेध व्यक्त करणे हे आश्चर्यकारक आहे. यातून भाजपचा सामान्यांशी संपर्क नसल्याचे स्पष्ट होते. निवडणुकीनंतरचा हिंसाचाराच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. उलट ते भाजपसाठी लाजीरवाणे आहे. – शंतनू सेन, तृणमूल काँग्रेस नेते
अनंत महाराज यांच्या भेटीला ममता दीदी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपचे राज्यसभा खासदार अनंत महाराज उर्फ नागेन रॉय यांची कूंचबिहार येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राजभोंगशी समुदायाचे बडे नेते म्हणून रॉय यांचे मोठे प्रस्थ आहे. रॉय यांनी त्यांचे स्वागत केले. सुमारे ३५ मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. तत्पूर्वी, कूंचबिहारमधील मदन मोहन मंदिरात ममता यांनी पूजा केली.