संसदेचे कामकाज सुरु होताच पंतप्रधान मोदींनी सभागृहात प्रवेश केला. यावेळी संसदेत आसनस्थ असलेल्या सर्व खासदारांनी त्यांना हात जोडून अभिवादन केले. यावेळी राहुल गांधीही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात बसले होते. त्यांनी देखील स्मित हास्य करत हात जोडून पंतप्रधान मोदींना अभिवादन केले. यातून राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संघर्षाची झलक दिसली आहे.
संसदेच्या नव्या इमारतीमध्ये शपथ घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एनडीए आघाडीसाठी सुद्धा ऐतिहासिक दिवस’ असल्याची टिप्पणी करत ‘एनडीए सरकारमध्ये लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची, भारताला प्रगतीच्या आणि विकासाच्या दिशेने पुढे नेण्याची पूर्ण क्षमता आहे.’ असे देखील पंतप्रधान म्हणाले आहेत.
पंतप्रधानांनी पुढे आपल्या भाषणात नमूद केले की, संसदीय लोकशाहीसाठी आज गौरवशाली दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संसदेच्या या नव्या इमारतीत शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मी सर्व खासदारांचे याठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि त्यांना शुभेच्छा देतो.
‘१८ व्या लोकसभेचे कामकाज आजपासून सुरु होत आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक आपल्या देशात गौरवशाली पद्धतीने पार पडली. ही निवडणूक फार महत्वाची होती कारण स्वातंत्र्यत्तर काळानंतर भारतीय नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा एखाद्या सरकारला भारताचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.’ असे म्हणत पंतप्रधानांनी देशातील नागरिकांचे आभार मानले.
पुढे नागरिकांना उद्देशून मोदी म्हणाले की, देश सुरळीतपणे चालण्यासाठी बहुसंख्य लोकांमध्ये एकमत असण्याची गरज असते, असा आमचा विश्वास आहे. भारतातील १४० कोटी लोकांच्या संमतीने मी त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
तसेच भारताच्या विरोधी पक्षाकडूनही उचित पावलं उचलली जावीत. तसेच नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे संसदेत लोकशाहीचा आदर ठेवून आवाज उठवला जावा. कारण लोकांना नाटक आणि गोंधळ केलेला आवडत नाही, असे देखील पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून विरोधकांनाही बोल सुनावले आहेत.
दरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत विरोधी पक्षातील खासदारांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. हातात संविधानाची प्रत घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रोटेम स्पीकर आणि नीट पेपर लीक प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.