अंतराळामध्ये जाऊन चांद्रयान-4 जोडले जाणार
चांद्रयान-4 हे एकाच वेळी नाही तर दोन स्वतंत्र रॉकेट प्रक्षेपित करून अवकाश कक्षेत पाठवले जाणार आहे. त्यानंतर अवकाशातच या दोन भागांना जोडून चांद्रयान-4 तयार केले जाईल. तसेच ज्या प्रमाणे चांद्रयान-3 हे चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर उतरले तेथेच चांद्रयान-4 उतरवले जाणार असल्याची माहिती एस.सोमनाथ यांनी दिली आहे.
अंतराळात स्पेस स्टेशन तयार करणार
भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करण्यासाठी चांद्रयान- 4 चे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. तसेच त्या स्पेस स्टेशनचे नाव भारत स्पेस स्टेशन असे असणार आहे.
मोहीम 2028 पर्यंत राबवली जाणार
चांद्रयान-4 हे दोन भागांमध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. त्याच कारण म्हणजे ते इतके वजनदार असणार आहे की सध्या इस्रोकडे उपलब्ध असलेल्या कोणत्याही रॉकेटमधून त्यांची वाहतूक होणे शक्य नाही. चांद्रयान-4 हे जगातील पहिले अंतराळयान असेल जे अनेक भागांमध्ये सोडले जाऊन ते पुन्हा एकदा अवकाशात एकत्र जोडले जाईल. तसेच ही मोहीम 2028 पर्यंत राबवण्यात येणार असल्याची माहिती एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
दरम्यान, 2023 मध्ये चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला. अशातच आता चांद्रयान-3 च्या मोहिमेनंतर चांद्रयान-4 मोहीम ही त्याहून मोठी असल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं आहे.