हायलाइट्स:
- शरद पवारांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषद
- मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्व विषयांवर मांडली भूमिका
- केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर व्यक्त केली तीव्र नाराजी
मुंबई: ‘केंद्रातील सत्ताधारी भाजपला महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे प्रयत्न करूनही पाडता आलेलं नाही म्हणूनच नेत्यांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. पण, सत्तेचा गैरवापर करायचा नाही हे संस्कार आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडून घेतले आहेत,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं. (Sharad Pawar attacks Modi Government over misuse of central agencies)
वाचा: मुंबई ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला आजही दिलासा नाही!
महाराष्ट्र बंदवर भाजपकडून झालेली टीका, महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘सत्तेचा गैरवापर हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच होतोय, असं नाही. इतरही पक्षांना याचा फटका बसला आहे. ‘जालियनवाला बाग’ असा शब्द मी लखीमपूर येथील घटनेबद्दल वापरला. त्यावेळी दोन-तीन भाजप मंत्र्यांना वाईट वाटलं, त्यांचे मला फोन आले. हे शब्द तुम्ही चांगले वापरले नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर हे पाहुणे घरी आले, असं शरद पवार अजित पवार यांच्यावरील इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाई संदर्भात म्हणाले.
वाचा: ‘ती माहिती द्यायला सावरकर हे राजनाथ सिंहांच्या स्वप्नात आले होते का?’
‘पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण होईल, इतका पाहुणचार घेऊ नये. आज माझ्या मुलींच्या घरी सहा दिवसांपासून १८ सरकारी पाहुणे बसलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनाही घरी जायचं आहे, पण त्यांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना वरून आलेल्या नाहीत. याआधी देखील केंद्रीय यंत्रणांनी घरी जाऊन चौकशी केलेली आहे. पण इतक्या दिवस ठाण मांडून बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. तरीही आमची याबाबत काही तक्रार नाही,’ असंही पवार म्हणाले.
यूपीत समाजवादी पक्षाला पाठिंबा
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील भूमिकाही शरद पवार यांनी यावेळी जाहीर केली. ‘उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन करायचं असेल तर जो भाजप विरोधी पक्ष तिथं सर्वात ताकदवान आहे, त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, अशी आमची भूमिका आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना आम्ही समर्थन देत आहोत. आम्हाला जागा कमी मिळाल्या तरी भाजपच्या पराभवात खोडा न घालण्याची आमची भूमिका आहे,’ असं पवार यांनी स्पष्ट केलं.