परिस्थिती नियंत्रणात?; महाजनकोत एका दिवसात ६०० मेगावॉटची वाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः राज्य सरकारच्या ‘महाजेनको’च्या औष्णिक वीजनिर्मितीत एकाच दिवसांत ६०० मेगावॉटची मोठी वाढ झाली आहे. यावरूनच कोळसा टंचाईवर झपाट्याने मात केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात सर्वाधिक वीज वितरण करणाऱ्या महावितरणला सर्वाधिक वीजपुरवठा महानिर्मिती (महाजेनको) या राज्य सरकारी कंपनीकडूनच होतो. कोळशाअभावी कंपनीचे जवळपास सहा संच बंद करण्यात आले होते. तर कंपनीची औष्णिक ऊर्जानिर्मितीदेखील चार हजार ८०० मेगावॉटपर्यंत घसरली होती. पण महाजेनकोने कोळशाचे सुयोग्य व्यवस्थापन करीत मंगळवारी औष्णिक वीजनिर्मिती ५,२०० मेगावॉटवर नेली. त्यानंतर बुधवारी हे उत्पादन ५८०० मेगावॉटवर नेण्यात आले. कोळशाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे चित्र यावरून स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने कोराडी, चंद्रपूर व खापरखेडा या प्रकल्पांमधील वीजनिर्मिती वाढली आहे. यासोबतच महाजेनकोचे एकूण वीज उत्पादन ८,५०० मेगावॉटवर पोहोचले आहे. ते मंगळवारपर्यंत ७,५०० मेगावॉटदरम्यान होते.

दुसरीकडे, महाजेनकोने पावसाळ्याआधी सूचना देऊनही कोळसा साठा केला नसल्याचे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (वेकोलि) म्हटले आहे. ‘वेकोलि’ ही केंद्रीय कोळसा मंत्रालयांतर्गत असलेल्या कोल इंडिया लिमिटेडची (सीआयएल) उपकंपनी आहे. ‘महाजेनको’च्या प्रकल्पांना सर्वाधिक कोळसा ‘वेकोलि’कडूनच पुरवला जातो. जूनमध्ये राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउनसदृश्य वातावरण होते. राज्यातील ऊर्जा मागणी कमी होती. त्यामुळे ‘महाजेनको’ने त्यावेळी ‘वेकोलि’ला पत्र लिहून दररोजच्या २२.५० रेक गाड्या कोळशाऐवजी १०.२ रेक कोळसा पुरवठाच करावा, असे पत्र लिहिले होते. पण पावसाळ्यात कोळसा उत्पादन प्रतिदिन सात लाख टनाने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी कोळसा साठा करून घ्यावा, असे ‘वेकोलि’ने ‘महाजेनको’ला सुचवले होते. पण, त्यावेळी हा कोळसा साठा केला गेला नाही. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कोळशाची तूट निर्माण झाली, असे चित्र दिसून येत आहे.

Source link

coal shortage in maharashtramahagenco unitspower cut crisis in maharashtraShortage of coalमहावितरणराज्य सरकार
Comments (0)
Add Comment