नेमकं काय घडलं?
१३ ऑगस्टच्या रात्री मोहंमद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिकअप गाडी घेऊन गोडाऊन समोर आला. गोडाऊन समोर तीन ते चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना दुचाकी बाजूला करा असे सांगत, मला त्याठिकाणी गाडी उभी करायची असे सांगितले. चालक गाडी मागे पुढे करत असताना तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामाबाहेर आले. तोपर्यंत तरुणाच्या गटाने जवळपास २० पेक्षा जास्त तरुणांना बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने कामगार आणि बबलूला मारहाण केली. या घटनेमुळे घाबरलेल्या कामगारांनी पळ काढला.
उपचारादरम्यान बबलू याचा मृत्यू
दरम्यान, कामगार पळून गेल्याने बबलू एकाकी पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बबलू गुप्ता बेशुद्ध अवस्थेत गोदामासमोर आढळून आला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
टिटवाळ्यात बॅगेत वृद्धाचा मृतदेह
दरम्यान, दादर रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण तालुक्यातील वरप गावात निर्मनुष्य ठिकाणी फेकलेल्या बॅगेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह सापडला. त्याचं वय ६५ ते ७० वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता असून वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही.
कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.