
Tej Police Times
गणेशोत्सवाला अद्याप २५ दिवसांचा अवधी बाकी आहे. मात्र, आतापासूनच प्रत्येकाला गणपतीच्या आगमनाचे वेध लागले असून विविध ठिकाणी आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोकणामध्येही उत्साहात गणेशोत्सव साजरी होत असून त्यासाठी दरवर्षी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अन्य परिसरातील मोठ्या प्रमाणावर कोकणवासी गावी जात असतात. परिणामी रेल्वेचे बुकिंग अगोदर फुल्ल होऊन जाते. खासगी बसने जाय़चे झाल्यास प्रवाशांना तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. कारण, गर्दीच्या हंगामात खासगी बसेसच्या तिकीटाचे दर वाढलेले असतात. अशावेळी गावी जायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत असला तरी एसटीकडून गणेशोत्सवानिमित्त जादा बसेस सोडल्या जातात. जेणेकरून कोकणवासीयांना गावी जाता येणार आहे.
एसटीच्या ठाणे विभागाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह कोल्हापूर, सांगली, सातारा येथे जाण्यासाठी नियमित बसेससह जादा २ हजार ३२ बसेसचे नियोजन केले आहे. या बसेसपैकी १ हजार ५६८ बसेस ग्रुप बुकिंगसाठी आणि ४६४ गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथून जास्तीच्या गाड्या मागण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. जादा बसेस २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नियोजित बसेसपैकी ५०१ बसेसचे ग्रुप बुकिंग आणि ३३८ बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. अशाप्रकारे एकूण ८३९ बसेस आताच फुल्ल झालेल्या आहेत. गेल्यावर्षी याच विभागातून गणेशोत्सवानिमित्त ग्रुप बुकिंगसाठी १ हजार ४९३ आणि आरक्षणासाठी ४६४ अशा एकूण १ हजार ९५७ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यंदा अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.