
Tej Police Times
मुंबई-गोवा हा रस्ते प्रवास खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. उत्सवकाळातील पाऊस आणि महामार्गावरील खड्डे पाहता, रस्ते प्रवास अधिकच त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रवाशांची रेल्वेगाड्यांना पसंती आहे. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथून कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने नियमित रेल्वेगाड्यांसह २२२ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. दोन्ही प्रकारांतील रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांकडून गाड्यांबाबत सातत्याने विचारणा होत आहे.
उत्सवकाळात प्रवासी गर्दी विभागण्यासाठी पनवेलपासून कोकणातील विविध स्थानकांपर्यंत आणखी ३६ रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार आहे. मात्र कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेगाड्या चालवण्यासाठी जागा नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विशेष गाड्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Western Railway Block: मुंबईकरांनो लक्ष द्या; पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, ९६० लोकल फेऱ्यांवर परिणाम
कोकण रेल्वेमार्गावर जागेची मर्यादा असून, मुंबईसह पुणे, मुंबई सेंट्रल, पुणे येथूनही रेल्वेगाड्या कोकणात दाखल होत आहे. यामुळे अतिरिक्त गाड्यांच्या मुद्द्यावर ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
समाजमाध्यमांवर बोरिवली गाडीची हवा
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी बोरिवली आणि वांद्रे स्थानकावरून कोकणात रेल्वेगाडी सुरू होणार असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर आहे. बोरिवली ते मडगाव रेल्वे सुरू होणार असल्याचे फलक प्रवासी संघटनांच्या विविध समूहांमध्ये व्हायरल होत आहेत. मात्र गाडी नेमकी कधी आणि केव्हा सुरू होणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बोरिवलीहून सुटणाऱ्या गाडीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.