
Tej Police Times
यासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी रस्ते व वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर ते ३१ मे २०२५ या कालावधीत रस्ते ही कामे वेगाने पूर्ण करा. त्याचवेळी दर्जा, गुणवत्तेशी तडजोड होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किमी आणि दुसऱ्या टप्प्यात ३०९ किमी असे एकूण मिळून ७०१ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी महापालिकेकडून कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगराचा समावेश आहे. सिमेंट काँक्रीट रस्ते बनवण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू होण्यासाठी साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो. दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काँक्रीटीकरण होणाऱ्या रस्त्यांची यादी तयार करावी. प्रत्येक महिन्यांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. त्याचा पाठपुरावा करावा, रस्ते विकासांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. जो रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे, तो प्राधान्याने पूर्ण करावा. अपूर्ण अवस्थेतील रस्ते पूर्ण करूनच नवीन काम हाती घ्यावे, असे बांगर यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी आयआयटी मुंबईची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची अंमलबजावणी सुरू करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी आयआयटीकडे सोपवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामध्ये काँक्रीट प्लांटपासून ते काँक्रिट रस्त्यावर क्युरिंग करण्यापर्यंतच्या कामाचा समावेश असेल. विविध चाचण्यांच्या माध्यमातून काँक्रीटीकरणाचा दर्जा तपासला जाणार आहे. अधिकारी व कंत्राटदार यांना गुणवत्तेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आयआयटीकडे आहे. येत्या आठवडाभरात महापालिका आणि आयआयटीमध्ये याबाबत सामंजस्य करार केला जाणार आहे.
महापालिकेच्या जलअभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रचालन आदी विविध विभागांशी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले. विद्युत, गॅसवितरण आणि दूरध्वनी कंपन्यांशी संपर्क साधून महापालिकेने रस्ते विभागाच्या कार्यक्रमाची माहितीही द्यावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.