
Tej Police Times
नागपूर, दि. २९ : विदर्भ विकासाला गती देणाऱ्या योजना पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा प्रयत्न असून या अधिवेशनाच्या माध्यमातून ते साध्य झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येईल आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत सांगितले. विधान सभेत 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. विरोधी पक्ष नेते तसेच सत्ताधारी पक्षाकडून सदस्यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेला गोसीखुर्द प्रकल्पासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2013-14 पर्यंत 8400 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते. आता एक लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अपूर्ण योजनांना चालना देऊन त्या पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंचनाच्या संदर्भात विदर्भात चांगले काम केले आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये विदर्भात 40 हजार हेक्टर क्षमतेचे काम पूर्ण झाले आहे. मराठवाड्यामध्ये 11 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार, तर उर्वरित महाराष्ट्रात एक लाख 28 हजार 256 हेक्टर सिंचन क्षमता निर्मित झाली आहे. याशिवाय, विदर्भातील सहा मोठ्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून इतर पाच प्रकल्पांची मान्यता अंतिम टप्प्यात असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.
दीपक चव्हाण/विसंअ/
000
Recover your password.
A password will be e-mailed to you.