Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Politics | सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून काँग्रेस पक्षाला झटका दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सत्यजीत तांबे काय भूमिका मांडतात, हे पाहावे लागेल. ते उघडपणे भाजपचा पाठिंबा मागणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हायलाइट्स:
- फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश झळकत आहे
- सत्यजीत तांबेंचं मोठं पाऊल, सोशल मीडिया डीपी बदलला?
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सत्यजीत तांबे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, सत्यजीत तांबे यांनी अर्ज मागे न घेतल्याने ते आता दोन हात करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कालपासून सोशल मीडियावर सत्यजीत तांबे यांच्याबाबतची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ‘जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील, त्यांना माझा शब्द आहे. माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल’, अशा आशयाची पोस्ट असून खाली सत्यजीत दादा तांबे पाटील असे लिहिले आहे.
अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यापासून तांबे पितापुत्र प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. सत्यजीत तांबे निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु, सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे समोर दिसताच मोघम संवाद साधला होता. मी १८ किंवा १९ तारखेला यासंदर्भात तुमच्याशी सविस्तर बोलेन. आता जेवढं ठरलं होतं, तेवढं तुमच्याशी बोललो, असे सांगत सत्यजीत तांबे यांनी काढता पाय घेतला.
सत्यजीत तांबेंवर काँग्रेसकडून निलंबनाच्या कारवाईची शक्यता
पक्षाचा एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे काँग्रेस हायकमांडने डॉ.सुधीर तांबे यांना पक्षातून तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित केले आहे. चौकशी होईपर्यंत ते निलंबित असतील. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सत्यजीत तांबे यांच्यावरही अशाच स्वरुपाची कारवाई होऊ शकते. सत्यजीत तांबे हे आमदार-खासदार नसल्याने त्यांच्याविरूद्धची कारवाई केंद्रीय शिस्तभंग समितीकडून नव्हे तर प्रदेश काँग्रेसच्या स्तरावरच होऊ शकते.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांसाठी तर नाशिक ,अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.