
Tej Police Times
माझ्या घरी रहायचं असेल तर पैसे आण, हुंड्यासाठी त्रास…
याविषयी १७ वर्षीय पीडितेने बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात तक्रारीवरून, पीडितेचा पती हा बीड पोलीस दलात आहे. १८ मे २०२२ रोजी तिचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून दिला. त्यानंतर सासरच्या मंडळीने एक महिना चांगले नांदवले. त्यानंतर पती, सासरा, सासू, भावजय, जाऊ, दीर, नणंद यांनी प्लॉट घेण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये घेवून ये म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावर आई-वडील गरीब असल्याचे सांगितल्यावर इथे रहायचे असेल तर पैसे आणावेच लागतील, असे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. हा त्रास वाढतच राहिल्याने ही बाब पीडितेने वडिलांना सांगितली व त्यानंतर वडील माहेरी घेवून गेले.
त्यानंतर मुलीला नांदायला पाठवायचे असेल तर प्लॉटसाठी १५ लाख रुपये द्या, नाही तर मुलीला पाठवू नका, असा निरोप सासरच्या मंडळींनी दिला. त्यानंतर माहेरी येवून पैसे द्यावेच लागतील असे म्हणून पतीने शिवीगाळ करत मारहाणही केली. या दिलेल्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात दि. २ जानेवारीला पतीसह सासरच्या ८ जणांवर कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विशेष म्हणजे ही फिर्याद देतानाच पिडीतेने आपलं वय १७ असल्याचं नमूद केलय. तसं पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देखील १७ वर्ष नमूद आहे. मग हे सर्व असताना संबंधित पोलिसांनी आणि ठाणे प्रमुखांनी बालविवाहाचा गुन्हा का दाखल केला नाही ? असा सवाल उपस्थित केला जातोय.
इच्छेविरोधात संबंध ठेवले, मला प्रेग्नेंट ठेवलं!
तर या १७ वर्षीय पिडीतेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बालकल्याण समितीमध्ये लिखित म्हणणं मांडलंय. माझ्या इच्छेविरुद्ध माझा बालविवाह झाला आहे. मी नववीत असताना ७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझा साखरपुडा झाला. त्यावेळी मला काही समजत नव्हते. मात्र १८ मे २०२२ रोजी माझा विवाह सचिन पवार रा. काळेगाव हवेली तांडा याच्याशी लावून दिला. या विवाहाला माझा विरोध होता. त्यानंतर माझ्या पतीने माझ्या सोबत इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले, इच्छा नसतानाही बळजबरी केली. मी त्यातून गर्भवती राहिले, त्यानंतर माझ्या पतीने बीडमधील घोळवे हॉस्पिटलमध्ये नेऊन माझी तपासणी करत सोनोग्राफी केली आणि मेडिकलमधून गोळ्या आणल्या. त्या गोळ्या घरी आल्यावर स्वतःच्या हाताने खाऊ घातल्या. त्यानंतर २४ जून २०२२ रोजी पुन्हा माझ्या पतीने घोळवे हॉस्पिटलमध्ये नेले आणि तेथे तपासणी केली असता, मला पांढरी कावीळ झाल्याचं सांगितला. अन त्यानंतर माझ्या पतीने मला माहेरी नेऊन सोडलं.
हे सर्व केलं असतानाही पती वारंवार धमक्या देत आहे. बालविवाहाबाबत, गर्भपाताबाबत कुठेही कसल्याही प्रकारची तक्रार केली, तर माझे काही वाकडे होणार नाही. त्यामुळे माझ्या पतीसह ज्यांनी ज्यांनी माझा बालविवाह लावला त्या सर्वांवर कारवाई करावी, अशी आर्त हाक पीडितेने बालकल्याण समितीला केलेल्या लिखित अर्जातून केलीये.
Recover your password.
A password will be e-mailed to you.