तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Pune Covid Restrictions: पुण्यातही कोविड निर्बंध शिथील होणार?; मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांची चर्चा

0 91

हायलाइट्स:

  • पुणे शहर आणि जिल्हा लेव्हल तीनमध्येच राहणार.
  • काही प्रमाणात सवलती दिल्या जाण्याची शक्यता.
  • मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांनी केली चर्चा: वळसे

पुणे: पुणे शहरातील करोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली असून, येत्या एक ते दोन दिवसांत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तसेच पुणे जिल्ह्याला दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. पुण्यातील महिला पोलीस उपायुक्तांच्या बिर्याणीच्या मागणीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांना चौकशीच्या सूचना दिल्या असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य सरकार भूमिका घेईल, असेही वळसे पाटील यांनी यावेळी सागितले. ( Dilip Walse Patil On Pune Covid Restrictions )

वाचा:पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता पुण्यासह राज्यातील ११ जिल्ह्यांत ‘ लेव्हल तीन ’चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, निर्बंध शिथिल करून दुकाने खुली ठेवण्याची वेळ वाढवावी, अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी लवकरच पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यासाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकार घेईल, असे सूतोवाच पत्रकारांशी बोलताना केले. याबाबत उपमुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं असून काही प्रमाणात सूट पुण्याला निश्चितपणे मिळेल, असे वळसे म्हणाले.

वाचा: बीडमध्ये प्रवेशापूर्वी अँटिजेन चाचणी; पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

‘त्या’ ऑडिओ क्लिपची होणार चौकशी

पुण्यातील महिला पोलीस उपायुक्तांच्या साजूक तुपातल्या बिर्याणीच्या मागणीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावर हप्तेखोरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याच्या रोषातून अडचणीत आणण्यासाठी ही ऑडिओ क्लिप प्रसारित करण्यात आल्याचा दावा संबंधित पोलीस उपायुक्ताने केला होता. याबाबत पोलीस आयुक्त काहीच बोलत नाहीत, असा प्रश्न विचारला असता, गृहमंत्री म्हणाले, ‘ही माहिती अतिशय गंभीर स्वरूपाची असून, पोलीस आयुक्तांना सर्व बाजूने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य सरकारला निश्चित भूमिका घेता येईल.’

गणपरावांचा संघर्ष जवळून पाहिला

गणपतराव देशमुख यांच्यासोबत मी २५ वर्षे काम केलं. ते आणि मी सभागृहात एकाच बेंचवर होतो. त्यांच्याबद्दल अनेक आठवणी असून ते सभागृहात नेहमी प्रत्येक विषयाची सखोल माहिती देत आणि परखडपणे भूमिका मांडत असत. भले सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी सभागृहात नेहमीच आपली छाप सोडली. त्यांचं संघर्षाच आणि विकासाचं राजकारण मी जवळून पाहिलं आहे. ते राजकारणातील भीष्म पितामहच होते. अशा व्यक्तिमत्वाच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीच भरून निघणार नाही, अशा शब्दांत यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी गणपतरावांना श्रद्धांजली वाहिली.

वाचा: ‘विरोधी पक्षाला काही काम नसतं, डोकं मोकळं असल्यानं ते काहीही आरोप करतात’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.