Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

SRA प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना दणका; राज्य सरकारची मोठी घोषणा

11

हायलाइट्स:

  • राज्य सरकारचा बिल्डरांना दणका
  • रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार
  • मुंबईत ५०० हून अधिक एसआरए प्रकल्प रखडलेले

मुंबई: बिल्डरांनी गृहनिर्माण प्रकल्प रखडवल्यामुळं बेघर झालेल्या व वर्षानुवर्षे स्वत:च्या खिशातून भाडे देऊन राहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बिल्डरांनी रखडवलेले गृहनिर्माण प्रकल्प एसआरए (SRA) ताब्यात घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून (SRA) गृहनिर्माण प्रकल्पासाठी इरादा पत्र (LOI) घेऊन आणि बँका व वित्तसंस्थांकडून कर्ज घेऊन अनेक बिल्डरांनी प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत. एसआरएच्या नावानं असे ५०० हून अधिक प्रकल्प सध्या रखडलेले आहेत. एलओआय पाहून बँका व वित्तसंस्थांनी त्यात गुंतवलेले पैसे व बंद पडलेले प्रकल्प यांचा हिशेब केल्यास सुमारे ५० हजार कोटी यात गुंतलेले आहेत. दुसरीकडं अनेक झोपडपट्ट्यांतील घरं अर्धी तुटलेली आहेत. हजारो लोक रस्त्यावर आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी एसआरएनं रखडलेले प्रकल्प ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प ताब्यात घेऊन गोरगरिबांच्या पुनर्वसनाचं काम केलं जाईल. शिवशाही पुनर्विकास प्रकल्प या कंपनीच्या मार्फत त्यासाठी निधीचं नियोजन केलं जाईल,’ असं आव्हाड यांनी सांगितलं. त्याचबरोबर, प्रकल्पाचा एलओआय घेऊन दहा-दहा आणि १५-१५ वर्षे त्याच्या जिवावर मजा मारणं यापुढं चालू दिलं जाणार नाही. यापुढं एलओआय घेतल्यानंतर काम सुरू करण्यासाठी ठराविक वेळेची कायदेशीर मर्यादा घातली जाईल,’ असंही आव्हाड यांनी सांगितलं.
वाचा: जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं मास्क न घालता भाषण; पाहा काय घडलं?

‘काही बिल्डरांनी खासगी वित्त संस्थांकडून ५०० आणि हजार कोटी रुपये घेतले आहेत. ते बिल्डर आता प्रकल्पांकडं बघायलाही तयार नाहीत. त्यामुळं एसआरएमध्ये पैसा येणं कमी होऊ लागलं आहे. पुढच्या प्रकल्पाला लागणारा पैसा थांबलाय. गरिबांची घरं रखडलीत. हे एक दुष्टचक्र झालंय,’ असं आव्हाड म्हणाले. ‘आर्थिक कारणांव्यतिरिक्त इतर कारणांमुळं रखडलेल्या प्रकल्पांच्या बाबतीतही एसआरए आता निर्णय घेईल. त्याबाबत दिरंगाई होणार नाही. गोरगरिबांच्या घरांच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही. प्रकल्प ताब्यात घेण्याच्या आमच्या निर्णयाविरोधात बिल्डर कोर्टात गेले तर आम्हीही कोर्टात जाऊ,’ असंही आव्हाड यांनी सांगितलं.

वाचा: तहसीलदाराच्या एका चुकीमुळं नगर जिल्ह्यात मोठा राडा; पोलीसही हतबल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.