Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nana Patole फाळणी वेदना स्मृतीदिन: ‘या’ नेत्याने व्यक्त केली मोठी भीती

18

हायलाइट्स:

  • फाळणी वेदना स्मृतीदिन ही धोक्याची घंटा!
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप.
  • देशात पुन्हा रक्तपात करायचाय का?: पटोले

नागपूर: ‘१४ ऑगस्ट हा फाळणी वेदना स्मृतीदिन म्हणून पाळण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय हा भविष्यातील धोक्याची घंटा आहे. १४ ऑगस्ट १९४६ रोजी देशात दोन समुदायामध्ये मोठा रक्तपात झाला होता. नरेंद्र मोदींना आता पुन्हा त्या रक्तपाताची आठवण करून द्यायची आहे का? देशात पुन्हा रक्तपात करायचा आहे का?’, अशा प्रश्नांची सरबत्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ( Nana Patole On Partition Horrors Remembrance Day )

वाचा:राज्यात उद्यापासून निर्बंध होणार शिथील; पुण्याला मिळाला ‘हा’ दिलासा

प्रदेश काँग्रेसच्यावतीने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानानिमित्त नागपुरातील कार्यक्रमात ते बोलत होते. १४ ऑगस्टच्या फाळणीच्या वेदनेची आठवण म्हणून स्मृतीदिनाच्या आडून देशातील हिंदू मुस्लिम वाद उभा करायचा भाजपचा कुटील हेतु दिसत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तेसाठी भाजप हे उद्योग करत आहे का? अशी शंका पटोले यांनी उपस्थित केली. मोदींचा व भाजपाचा डाव ओळखा आणि या शक्तीविरोधात काँग्रेसची शक्ती उभी करा, असे आवाहनही त्यांनी केले. अहिंसा व मनुष्यशक्तीच्या बळावर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले परंतु, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा कधीच सहभाग नव्हता, मानवता व त्यागाशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा लोकांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेवर आहे. मोठ्या कष्टाने व बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर संविधान मिळाले. आता ते स्वातंत्र्य व संविधान वाचेल की नाही, टिकेल की नाही याची शंका निर्माण करणारे वातावरण सध्या देशात आहे, असेही पटोले पुढे म्हणाले.

वाचा: केंद्र सरकारला मोठा धक्का; ‘त्या’ आयटी नियमाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती

इंग्रज सत्तेच्याविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात होते, त्यांचा आवाज दडपला जात होता. तीच परिस्थिती आज देशात आहे. केंद्रातील सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपशाहीच्या मार्गाने बंद करण्याचे काम सुरू आहे. दिल्लीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी त्या पीडितेल्या न्याय देण्यासाठी ट्वीट केले. देशातील बेरोजगारांचा आवाज बनले, गरिबांना दोनवेळच्या खाण्याचे संकट उभे ठाकले त्या सर्वांचा आवाज बनून राहुल गांधी उभे ठाकले, त्यासंदर्भातील ट्वीटरवर व्यक्त झाले म्हणून मोदी सरकारच्या दबावाखाली त्यांचे ट्वीटर खाते बंद करण्यात आले होते. लोकांच्या दबावामुळे राहुल गांधींचे हे ट्वीटर अकाउंट पुन्हा सुरु करावे लागले आहे, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला दुग्धविकास मंत्री सुनील केदार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, राजू पारवे, अभिजित वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद उपस्थित होते.

वाचा: करोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येऊ शकते!; अजित पवारांनी दिला इशारा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.