
Tej Police Times
राज्य मंडळाने २ ते २५ मार्च दरम्यान झालेल्या परीक्षेसाठी १५ लाख ४१ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्याचे प्रमाण ९३.८३ टक्के आहे. अनेक वर्षांनी यंदा पहिल्यांदा दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला.
या वेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी उपस्थित होते. यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित होती. त्याचा परिणाम निकालावर झाला असून, ९० टक्के आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे अकरावी, डिप्लोमा, आयटीआय प्रवेशासाठी ‘कट ऑफ’ गुण घटणार आहेत. या अभ्यासक्रमांना जागाही मुबलक उपलब्ध असल्याने सर्वांना प्रवेशाची संधी मिळेल.
राज्यात १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून, त्यापैकी १०८ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर विभागातील २२ विद्यार्थी आहेत. अमरावतीमधील ७, तर मुंबई विभागातील ६ आणि पुणे विभागातील ५ विद्यार्थी आहेत. त्यामुळे लातूर पॅटर्नचा पुन्हा बोलबाला दिसून येत असून, क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजांमधील ‘इंटिग्रेटेड कल्चर’ सिद्ध होत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावतीमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, https://11thadmission.org.in/ या लिंकहून अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात भाग दोन म्हणजेच कॉलेजांचे पर्याय भरण्याची प्रक्रिय़ा सुरू होईल. डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना https://dte.maharashtra.gov.in/ या लिंकहून अर्ज भरता येईल. आयटीआय प्रवेशांना लवकरच सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in/ या लिंकवर माहिती मिळेल
Recover your password.
A password will be e-mailed to you.