Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jitendra Awhad: तळियेतील घरांची पुनर्बांधणी ‘प्री फॅब’ पद्धतीने; आव्हाड यांनी दिले ‘हे’ निर्देश

18

हायलाइट्स:

  • महाडमधील तळिये गावाच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाची बैठक.
  • सर्व २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडा ‘प्री फॅब’ पद्धतीने करणार.
  • गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश.

मुंबई:रायगड जिल्ह्यातील महाड येथील तळिये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडाने ठरवून दिलेल्या काल मर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. तळिये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, आव्हाड यांनी तळिये वासियांसाठी टुमदार घरे देण्याचे आश्वासन आधीच दिलेले आहे. त्याची खास संकल्पचित्रेही त्यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केली होती. पुनर्वसनाची जागा ताब्यात आल्यावर म्हाडाकडून सँपल म्हणून असं एखादं घर प्रथम साकारलं जाईल, असे सांगण्यात येत आहे. ( Jitendra Awhad On Taliye Village Rehabilitation )

वाचा: मॉलमध्ये लहान मुलांना असा मिळणार प्रवेश!; राज्य सरकारचा सुधारित आदेश

गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड पुढे म्हणाले की, तळिये गावातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच तेथे रस्ते, वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात तळीये येथे जाऊन जागेची पाहणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सातही वाड्यांमधील २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडा ‘प्री फॅब’ पद्धतीने करणार असल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले.

वाचा:शरद पवारांना ‘ते’ चांगलं माहीत आहे!; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप

यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.

तळिये गावावर कोसळला ‘दु:खाचा डोंगर’

महाड तालुक्याला २२ जुलै रोजी अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. यावेळी तळिये गावात अख्खा डोंगरच खचून अनेक घरे त्याखाली गाडली गेली. त्यात सुमारे ८५ ग्रामंस्थांचा मृत्यू झाला तर ३१ ग्रामस्थांचा शोध लागू शकला नाही. नंतर या ग्रामस्थांनाही मृत घोषित करण्यात आले आहे. या भीषण संकटामुळे अख्खं गावच उद्ध्वस्त झालं असून या गावाच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही जबाबदारी म्हाडाने स्वीकारली असून त्यादृष्टीने मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली.

वाचा: महाराष्ट्रात पाच कोटी लसवंत!; ही विक्रमी कामगिरी करणारं दुसरं राज्य

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.