
Tej Police Times
‘फँड्री’तून समाजव्यवस्थेवर दगड भिरकावल्यानंतर सर्जनशील आणि संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’मधून पुन्हा जातीव्यवस्थेवर भाष्य केलं. परशा आणि आर्चीच्या अल्लड-निखळ प्रेमाच्या माध्यमातून त्यानं हा गंभीर विषय हाताळला आणि तो प्रेक्षकांना भावला देखील. अजय-अतुलचं संगीत, थिरकायला लावणारी गाणी नवीन चेहरे या सगळ्यांमुळं हा सिनेमा खास ठरला. पहिल्या एक दोन आठवड्यांत सिनेमानं चांगली पकड निर्माण केली होती. त्यानंतर सैराटची ‘माउथ पब्लिसिटी’ जोरात झाली. याचा फायदा या सिनेमाला झाला.हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता सहा वर्षे झाली आहेत. असं असलं तरी या सिनेमाची क्रेझ अजूनही आहेच. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयानं प्रेक्षक सैराट झाले होते. सिनेमानं भारतीय बॉक्स ऑफिसवर ८०. ९८ कोटींचा गल्ला जमला होता. तर जगभरातील कमाईचा आकडा हा ११० कोटी होता. त्यामुळं या सिनेमाचा रेकॉर्ड अद्यापही कोणत्या सिनेमाला मोडता आला नाहीये.
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ नं धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमानंही टक्कर देणाऱ्या या सिनेमाची चर्चा देशभर झाली. हिरो नसलेल्या या सिनेमानं अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवल्याचं टीममधले कलाकार स्वत: मान्य करतात. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. आता काही दिवसात हा चित्रपट ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणार का याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. सहा बहिणींची कथा असलेल्या या चित्रपटानं भारतात तब्बल ७२ कोटी ११ लाखांची कमाई केली आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमाई ही ८३ कोटी ५० लाखांवर पोहोचली आहे.
‘वेड’ चित्रपटानंही प्रेक्षकांना वेड लावलं. दाक्षिणात्य चित्रपट ‘माजिली’ चा रिमेक असणारा ‘वेड’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. फ्रेबुवरी महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. चित्रपटात लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. फक्त कथाच नाही तर या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सगळ्यांच्याच अपेक्षेवर खरा ठरत चित्रपट तब्बल १०० दिवस चित्रपटगृहात होता. १०० व्या दिवशी रितेशनं चित्रपटाची एकूण कमाई सांगितली होती. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या १०० दिवसात तब्बल ७५ कोटींची कमाई केली होती.
२०१६मध्ये नाना पाटेकरांचा ‘नटसम्राट’ या मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असल्यानं सिनेमाची प्रचंड चर्चा झाली होती. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. रंगभूमी गाजवणाऱ्या कलाकराच्या आयुष्यची ही कथा प्रेक्षकांना भावली, या सिनेमानं प्रेक्षकांना रडवलंही. सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं. सात कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ४८ कोटींची कमाई केली होती. सिनेमात नानांसोबतच दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांची देखील महत्त्वाची भूमिका होती. तसंच अभिनेता सुनिल बर्वे, मृण्मयी देशपांडेच्या यांनी देखील सिनेमात भूमिका साकारल्या होत्या.
करोना लॉकडाऊननंतर ‘पावनखिंड’ सिनेमानं सिनेमागृहाला प्रेक्षकांच्या गर्दीचे जुने दिवस दाखवून चांगला गल्ला जमवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, बाजीप्रभूंच्या भूमिकेत अजय पुरकर यांनी लाजवाब कामगिरी केली आहे.अजय यांनी भूमिकेसाठी घेतलेली शारीरिक मेहनत पडद्यावर विशेष दिसते. अभिनयातील संयम आणि व्यक्तिरेखेतील बारकावे त्यांनी पकडले आहेत. दुसरीकडे समीर धर्माधिकारी यांनी सिद्दी जौहरची भूमिका उत्तम वठवली आहे. झुंजार बांदल सेनेचा आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटानं एकूण ४३ कोटींची कमाई केली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.