Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- राजू शेट्टी यांची राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका
- हसन मुश्रीफांसह अनेक नेत्यांवर साधला निशाणा
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे सांगत व्यक्त केली नाराजी
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी कोल्हापुरात मोर्चा काढला होता. या मोर्चात संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील या सर्वांवर त्यांनी निशाणा साधत घरचा आहेर दिला. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीवर जोरदार टीका केल्याने या संघटनेची पुढील दिशा काय असणार, याबाबत आता उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.
मोर्चाच्या शेवटी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘मी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार आहे. मात्र मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे मात्र सत्तेच्या तुंबड्यासाठी कुठे कुठे जात आहेत ते माहीत नाही. मुश्रीफ साहेब, तुम्हाला वाटतंय की यड्रावकर निवडून आल्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. मी अस्वस्थ व्हायचे काही कारण नाही. बऱ्याच वर्षांनी शिरोळ तालुक्याला मंत्रिपद मिळालं आहे. मला वाईट वाटण्याचं काय कारण ? आणि तुम्ही माझी चिंता करू नका. माझा आणि यड्रावकरांचा राजकीय विरोध कायम राहणार. यापूर्वी यड्रावकरांच्या विरोधात निवडणुका लढविल्या. पुढेही निवडणूक लढवणार आहे.’
‘राष्ट्रवादीचे सत्तेचे लाभार्थी मुश्रीफ एकटेच आहेत’
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधताना राजू शेट्टी म्हणाले की, ‘यड्रावकरांच्या लक्षात आलं आहे, राष्ट्रवादीत राहिलो तर नुसतंच मुश्रीफांचे शेपूट धरुन राहिलो. हाती काहीच मिळाले नाही. राष्ट्रवादी सोडली, निवडून आले, मंत्री झाले. लांब कशाला, या कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सत्तेचे लाभार्थी मुश्रीफ एकटेच आहेत. विचारा ए. वाय. पाटील व के. पी. पाटील यांना. माझी दिशा बदलली म्हणून टीका करत आहात का? माझ्या नादी लागू नका. २०१९ मधील निवडणुकीत भाजपवाल्यांना जिल्ह्यातून पळवून लावलं आहे, तुम्हालाही पळवून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे का?
‘पूरग्रस्तांचा आक्रोश घेऊन कोल्हापुरात धडकलो. अनेकजण अस्वस्थ झाले. कोणी म्हणाले राजू शेट्टींनी घाई करू नये. जीआर निघेपर्यंत वाट पाहावी. एक महिना झाला. तरी तुमची मदत नाही. मुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी अतितातडीच्या मदतीचा अर्थ काय? अतितातडीची मदत म्हणून सानुग्रह अनुदान जाहीर झाले. कितीतरी जणांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. पालकमंत्री १७ कोटी रुपये वाटप केले म्हणतात. किती जणांना मदत मिळाली? सांगा कोणाचं नेमकं चुकत आहे…पालकमंत्र्यांचे की आमचे? विद्यापीठात एकदा शिकवणी लावा. सरकारी नोकरांचे पगार थांबले का? सगळ्यांना मदत केली, शेतकऱ्यांना मागे का ठेवला? पूरग्रस्तांची चेष्टा लावली आहे का? याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे,’ असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला.
दरम्यान, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना शेट्टी म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांना खर्चिक प्रकल्प राबविण्यात इतका इंटरेस्ट का? पंचगंगेपासून राजापूर बंधाऱ्यापर्यंत ३२ किलो मीटर बोगदा काढायला किती खर्च येईल? खर्चिक योजनेत तुम्हाला इंटरेस्ट जास्त आहे. पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी नियंत्रण मिळवण्यासाठी काही तरी करा,’ असं राजू शेट्टी म्हणाले.