तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Uddhav Thackeray vs Narayan Rane: उद्धव ठाकरे-नारायण राणे एकत्र येतील, एका ताटात जेवतील!; ‘या’ नेत्याचा दावा

0 48

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमधील वाद मिटेल.
  • प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात केला मोठा दावा.
  • शिवसेना-भाजप युतीबाबतही केले महत्त्वाचे विधान.

नागपूर: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया विदर्भ दौऱ्यावर आले असून नागपूर विमानतळ येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील संघर्षावर यावेळी तोगडिया यांनी महत्त्वाचे भाष्य केले. ( Pravin Togadia On Cm Thackeray And Narayan Rane )

वाचा:‘मी गँगस्टर होतो तर मग…’; नारायण राणेंचा शिवसेना नेतृत्वाला बोचरा सवाल

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली. राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यात मोठं रणकंदन माजलं. राणे यांना अटकेच्या कारवाईलाही सामोरं जावं लागलं. त्याचवेळी शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतील तणावही आणखी वाढला. या सगळ्या घडामोडींवर तोगडिया यांनी मोजकीच पण महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ‘उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद भविष्यात मिटेल आणि हे दोघेही एका ताटात जेवताना तुम्हाला दिसतील. हे राजकारण आहे. येथे सगळं काही चालतं. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आज एकमेकांच्या विरोधात असले तरी उद्या एकत्र येतील. ते कधी भांडतील आणि कधी एकमेकांच्या गळ्यात गळे घालतील सांगता येत नाही. हे सुरूच राहणार आहे’, असा दावा तोगडिया यांनी केला.

वाचा: मला अ‍ॅरेस्ट बिरेस्ट केली नाही!; नारायण राणे यांनी केला ‘हा’ स्फोटक दावा

आमचे समर्थन काँग्रेसलाही

केंद्रातील विरोधी पक्ष अधिक सक्षम करण्याची गरज आहे का, या प्रश्नावर बोलताना तोगडिया यांनी परखड मत मांडले. ‘सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत बेरोजगारी आणि शेतकऱ्यांसाठी आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी मिळून देशहिताय प्रयत्न करायला हवेत. असे कार्य करणारा कुठलाही पक्ष, त्याचा आम्ही जयजयकार करू. अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलासुद्धा आमचे सहकार्य असेल. आमची संघटना कुठल्याही एका राजकीय पक्षाची गुलाम नाही’, असे तोगडिया म्हणाले. देशात दहा कोटींहून अधिक बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. या समस्या सोडविणाऱ्या आणि देशहिताय कार्य करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे, असेही तोगडिया म्हणाले.

वाचा: महापालिका निवडणुकांबाबत ‘हा’ आदेश; माजी मंत्र्याचा सरकारवर गंभीर आरोप

भारताला तालिबानचा सर्वात मोठा धोका

‘भारताला तालिबानचा सर्वात मोठा धोका आहे. तालिबानी विचाराची केंद्रे भारतात आहेत. तालिबानला तोंड देण्यासाठी भारत सरकारने तबलीगी जमात, दारुल देवबंद, जमायते उलेमा हिंद या संघटनांवर बंदी घालायला हवी. नागपुरातील मदरशांमध्ये मौलवी तबलीगी जमातचे प्रशिक्षण देत आहेत. अफगाणिस्तानातील एकाही मुस्लिमाला भारतात स्थान नको, फक्त शिखांना राहू द्या’, अशी मागणी तोगडिया यांनी केली.

सिंघल, बाळासाहेब, कल्याणसिंह खरे नायक

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणकार्यावर समाधान व्यक्त करत असतानाच या कार्याचे खरे नायक अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि कल्याणसिंह असल्याचे तोगडियांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत तोगडिया यांचे स्वागत केले.

वाचा:मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.