तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

सिंगापूर-हाँगकाँगनंतर नेपाळमध्येही भारतीय मसाल्यांवर बंदी, निर्यात घटण्याची भीती; जाणून घ्या काय आहे कारण

0 50

वृत्तसंस्था, काठमांडू : भारतीय कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या मसाल्यांवर सिंगापूर आणि हाँगकाँगने बंदी घातल्यानंतर आता नेपाळनेही या मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करून त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने एमडीएच आणि एव्हरेस्ट कंपनीच्या चार मसाल्यांमध्ये इथेलीन ऑक्साइड किंवा ईटीओ या घटकाचा अंश निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

यात एमडीएच कंपनीच्या मद्रास करी पावडर, सांभार मिक्स्ड मसाला पावडर, मिक्स्ड मसाला करी पावडर आणि एव्हरेस्ट कंपनीच्या फिश करी मसाला पावडरचा समावेश आहे. या चारही मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साइडचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने त्यांच्या आयातीवर व विक्रीवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आले आहे, असे नेपाळच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने काढलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
Manipur News : संघर्ष आणि हिंसाचारामुळे समाजजीवन विस्कळित, मणिपूरमध्ये ६७ हजार जण विस्थापित
बाजारातील या मसाले उत्पादनांच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि ते सेवनासाठी घातक असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही याची गंभीरपणे नोंद घेतली, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. नेपाळच्या अन्नपदार्थ गुणवत्ता नियंत्रण विभागानेही देशातील आयातदारांना आणि व्यापाऱ्यांना ही उत्पादने बाजारातून मागे घ्यावीत, अशा सूचना केल्या आहेत.

गेल्याच महिन्यात सिंगापूर आणि हाँगकाँगनेही एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या ईटीओचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे सांगत या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी आणली होती. त्यानंतर भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके विभागाने (एफएसएसएआय) देशातील विविध कंपन्यांच्या मसाल्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासण्यास सुरुवात केली होती.
Pune News : बुरशी लागलेली औषधे विकणाऱ्या कंपन्यांना दणका, ग्राहकाला द्यावी लागणार एक लाख रुपयांची नुकसान भरपाई

४० टक्के निर्यात घटण्याची भीती

मसाल्यांमध्ये इथिलिन ऑक्साइडचा अंश असल्याच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास या आर्थिक वर्षात भारतीय मसाल्यांच्या निर्यातीत ४० टक्के घट होण्याची भीती शुक्रवारीच फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेकहोल्डर्सनी व्यक्त केली होती. जगातील आघाडीच्या मसाल्यांच्या उत्पादकांमध्ये भारताचा समावेश होतो. ‘स्पाइस बोर्ड इंडिया’च्या आकडेवारीनुसार, सन २०२१-२२मध्ये भारताने जगभरातील १८० देशांना चार अब्ज अमेरिकी डॉलर किमतीचे सुमारे २००हून अधिक मसाले आणि संबंधित अन्य उत्पादनांची निर्यात केली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.