
Tej Police Times

रविवारी रात्री ८.३० वाजता रेमल चक्रीवादळाने तडाखा दिला. रात्री १०.३० ते १२.३० या वेळेदरम्यान या चक्रीवादळाने बांगलादेश आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी सागर बेटे आणि खेपुपारा या दरम्यान ओलांडली. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अनेक कच्च्या घरांची छप्परे उडून गेली, विजेचे खांब आणि झाडे कोसळली. त्यामुळे पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह राज्यभरात नुकसान झाले. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणांचे प्रयत्न सुरू होते. मात्र सततच्या पावसामुळे यात अडथळे येत आहेत. वादळामुळे नेमके किती नुकसान झाले हे कळू शकलेले नाही, मात्र यातून सावरण्यासाठी खूप वेळ आणि प्रयत्न यांची आवश्यकता आहे, असे प्राथमिक अहवालांवरून दिसते.
राज्य सरकारने मदतकार्य सुरू केले असून बाधित लोकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने घरातच राहावे आणि योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वादळ आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे व शेतांमध्ये पाणी साचले. सुंदरबनच्या गोसाबा भागात एक जण जखमी झाला. कोलकात्याच्या बिबिर बागान भिंत कोसळल्यामुळे एक जण जखमी झाला. खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यंत पश्चिम बंगाल प्रशासनाने किनारी भागातील एक लाखलोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. सागर बेटे, सुंदरबन आणि काकद्वीप भागात प्रशासनाने मदतकार्य केंद्रीत केले आहे.
सोमवारी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रेमल चक्रीवादळाचा जोर कमी झाला. त्यावेळी ते कॅनिंगच्या ईशान्येला ७० किमी आणि मोंगलाच्या पश्चिम-नैऋत्येला ३० किमी अंतरावर होते. वादळाचा जोर यापुढे आणखी ओसरण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
ढाका: शक्तिशाली रेमल चक्रीवादळाने तडाखा दिल्यामुळे बांगलादेशात किमान सात जणांचा मृत्यू झाला. वादळामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने दीड कोटी लोकांना विजेविना अंधारात राहावे लागले. ताशी १२० किमीपर्यंतच्या वेगाने वाहिलेल्या वाऱ्यामुळे शेकडो गावांना तडाखा बसला.
सोमवारी वादळाचा जोर ओसरला, मात्र अनेक भागांमध्ये ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहत होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली. यंदाच्या पावसाळी मोसमापूर्वी निर्माण झालेले रेमल हे पहिलेच चक्रीवादळ होते. हिंदी महासागराच्या प्रदेशातील चक्रीवादळांचे नामकरण करण्याच्या पद्धतीनुसार ओमान या देशाने या चक्रीवादळाला रेमल हे नाव सुचवले होते. रेमल या अरबी भाषेतील शब्दाचा अर्थ वाळू असा होतो.
Recover your password.
A password will be e-mailed to you.