Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Rajasthan Violence: राजस्थानमधील जोधपूरमध्ये दोन गटात हिंसा,दुकाने,वाहने जाळली,२ पोलिस जखमी,५१ जणांना अटक
जोधपूर येथील सूरसागर येथील व्यापारी भागामध्ये दोन गटात गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होता. यादरम्यान येथील अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. याविरोधात दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान शुक्रवारी राजाराम सर्कल येथील ईदगाह मध्ये आपल्या धार्मिक स्थळाचे गेट उघडण्यासाठी गेलेल्या लोकांचा विरोधी गटाने विरोध केला. याचे पर्यवसान तणावात झाले. दोन्ही बाजूकडील संतप्त जमावाने जाळपोळ आणि दगडफेक सुरु केली. दोन गटामध्ये सुरु झालेली ही हिंसा रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
धार्मिक स्थळावरील प्रवेशद्वाराचा वाद
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार धार्मिक स्थळावरील प्रवेशद्वाराचा हा वाद जुना आहे. ईदगाह च्या मागील भिंतीवर उभारलेल्या दोन प्रवेशद्वारांमूळे या वादाला सुरुवात झाली. यामध्ये स्थानिकांनी या प्रवेशद्वारच्या बांधकामावेळी नगरपालिकेची कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नसल्याचा आरोप केला होता. ही बाब पोलिसांपर्यंतही गेली होती. परंतु या वादावर वेळीच योग्य ती कारवाई न केल्याने या वादाचे हिंसेत रुपांतर झाल्याचे म्हटले जात आहे.
दगडफेकीत दोन पोलिस जखमी
ईदगाह येथील प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी स्थानिकांनी विरोध केला. त्यावेळी पोलीस आणि नगरपालिका अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी दोन्ही बाजूच्या व्यक्तींना घेवून सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्यात आले होते. परंतु काही वेळाने १० ते १५ लोकांनी जवळच्या व्यापारी भागात दगडफेक सुरु केली. या दगडफेकीचे रुपांतर जाळपोळ आणि पर्यायाने हिंसेत झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाले.
हिंसेनंतर शनिवारी पोलिसांनी अटकसत्र सुरु करुन यामध्ये सहभागी असलेल्या ५१ आरोपींना अटक केली आहे. जोधपूरमधील ही तणावाची ही दुसरी घटना असून याआधी २०१९ मध्ये रामनवमीमध्येही असा तणाव निर्माण झाला होता. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी घटनेची माहिती घेत शांतता राखण्याचे आवाहन केले.