‘गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबारानंतर असाच बंद पुकारला होता का?’; भाजपचा पलटवार

हायलाइट्स:

  • शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर देशभरात संताप
  • महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक
  • भाजपने केला पलटवार

कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. याच घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर भाजपने पलटवार केला आहे.

‘ज्या घटनेचा महाराष्ट्राशी अर्थअर्थी संबंध नाही, ज्या घटनेतील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे, त्या घटनेबाबत पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी, त्यांच्या सरकारच्या काळात झालेले गोवारी हत्याकांड आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार याबाबत बंद पुकारला होता का,’ असा सवाल कोल्हापूर भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

amit shah : PM मोदी निरंकुश आहेत का? गृहमंत्री अमित शहांनी दिले टीकाकारांना प्रत्युत्तर

‘१९९४ साली आपल्या न्याय्य मागण्यांसाठी, स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आदिवासी गोवारी समाजाच्या नागरिकांनी नागपूर विधानसभेवर मोर्चा काढला होता. ५ हजारहून अधिक गोवारी बांधव या मोर्चात सहभागी होते. हा मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारात ११४ निरपराध लोकांना जीव गमवावा लागला. त्यात मोठ्या संख्येने लहान मुले व महिला होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यावर का गप्प बसले? त्याच पद्धतीने २०१२ मे मध्ये मावळ तालुक्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या पोलीस गोळीबारात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा पाठलाग करून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. या मागे तत्कालीन मंत्री अजित पवारांचा हात असल्याचे उघड बोलले जात होते. तेव्हा या आघाडीला शेतकऱ्यांवर झालेले अन्याय दिसले नाहीत का?’ असा खरमरीत सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, व्यापारी व व्यवसायिक बांधवांनी दबाव झुगारून आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, असं आवाहनही भाजपाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Source link

bjpfarmerlakhimpur kheriकोल्हापूरभाजपलखीमपूर खिरी हिंसाचारशेतकरीहत्याकांड
Comments (0)
Add Comment