कांद्याचा भाव वधारला; किरकोळ बाजारात ३० ते ३५ दर

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईः हंगामातील जुना कांदा संपण्याच्या मार्गावर असून, नवीन कांदा बाजारात यायला सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन कांद्याची गुणवत्ता योग्य नसल्याने, चांगला कांदा फारच कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. घाऊक बाजारात १० ते १२ रुपये किलो असणारा कांदा आता २० ते २२ रुपये किलोपर्यंत गेला आहे. सोमवारी किरकोळ बाजारातही कांदा ३० ते ३५ रुपये किलोच्या घरात पोहोचला.

सध्या वाशीच्या घाऊक बाजारात राज्याच्या कानाकोपऱ्यातून कांदा येत आहे. मात्र, या कांद्याचा दर्जा तितकासा योग्य नाही. हा नवीन कांदा ओलसर असून, आकारानेही लहान आहे. त्यातच बाजारात असलेला जुना कांदा आता फारच जुना झालेला आहे. त्यामुळे या कांद्याला हवा तसा उठाव नाही. त्यातच आता कांद्याच्या निर्यातदारांनीच कांद्याची खरेदी सुरू केली आहे. तेही नवीन कांदाच खरेदी करत आहेत. त्यामुळे दर्जेदार कांदा नसला, तरी नवीन कांद्याचा बाजारात भाव वधारला आहे. शनिवारी बाजारात या कांद्याला किलोमागे २५ रुपयांचा दर मिळाला होता. मात्र, आता सोमवारी बाजारात १५० गाड्यांची आवक झाल्यावर कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे हा कांदा २० ते २२ रुपये किलोवर स्थिरावला आहे. मात्र एकूणच कांद्याचे उत्पादन, कांद्याची आवक आणि मागणी यांचे गणित जुळत नसल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कांद्याला आणखीन भाव येण्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मागील वर्षभरात कांद्याच्या दरात चढउतार पाहायला मिळाला. आत्ता कुठे कांद्याला चांगला भाव मिळायला सुरुवात झाली असल्याने शेतकरी सुखावला असला, तरी एकूणच कांद्याचे उत्पादन समाधानकारक नसल्याने त्यांनाही कांद्याचा फटका सहन करावा लागत आहे.

Source link

nashik onion price latest newsnavi mumbai marketonion price latest newsonion price news todayकांद्याचा भाव वधारला
Comments (0)
Add Comment