Authored by प्रसाद रानडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Jan 2023, 9:34 am
Mumbai goa highway | या अपघातात मरण पावलेल्यांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यापैकी सात व्यक्तींचे मृतदेह गुहागर येथील गावी नेण्यात आले असून दोन मृतदेह हे नवी मुंबई आणि मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ट्रक चालकाची चूक भोवली.
हायलाइट्स:
- लोटे एमआयडीसीतून निघालेला ट्रक
- दुभाजक ओलांडून ट्रकचे मार्गक्रमण
पोलिसांनी कालच अमृत शंकर खेतरी (वय ४६) या ट्रक चालकाला अटक केली होती. तो रत्नागिरीतच राहणार आहे. अमृत खेतरी आपला ट्रक घेऊन लोटे एमआयडीसीमधून बाहेर पडला होता. मुंबईच्या दिशेने जात असताना हा ट्रक चुकीच्या दिशेने चालवला जात होता. या रस्त्यावर दुभाजक होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत जवळपास १.२ किलोमीटर अंतरापर्यंत अमृत खेतरी राँग साईडने ट्रक चालवत राहिला. तेव्हाच ट्रक कारला जाऊन धडकला. ट्रक चालकाच्या या एका चुकीमुळे १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी या ट्रक चालकावर बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात घडला तेव्हा कार खच्चून भरली होती. ट्रकचा डाव्या बाजुचा भाग कारवर जाऊन जोरात आदळला. त्यामुळे कारचा साहजिकच चेंदामेंदा झाला. मात्र, ही धडक इतकी जोरदार होती की, या धक्क्याने ट्रकही काही मीटर अंतरापर्यंत मागे गेला. या अपघातामध्ये कारमधील ९ जण जागीच गतप्राण झाले. भव्य निलेश पंडित हा चार वर्षांचा चिमुरडा जिवंत होता. अपघातानंतर मदतकार्यादरम्यान त्याच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा चेंदामेंदा झालेल्या गाडीतून मोठ्या शर्थीने या मुलाला बाहेर काढण्यात आले. त्याला सुरुवातीला माणगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे भव्यला मुंबईला हलवण्यात आले. मात्र, प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कंत्राटदारावर कारवाई होणार का?
गोवा-महामार्गावर माणगाव ते लोणेरदरम्यान काही ठिकाणी उड्डाणपूल आणि दुभाजकांची कामे सुरु असल्याने रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, वाहतूक वळवल्याची माहिती देणारे फलक लावले नसल्याने वाहन चालवताना अनेकजण संभ्रमात पडतात. त्यातून अनेक छोटे अपघात होतात. याची दखल शासकीय पातळीवर घेतली जात नाही. फलक नसल्याने ट्रक विरुद्ध दिशेने आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या अपघातासाठी ट्रक चालकासोबत कंत्राटदारही जबाबदार असल्याचा आरोप होत असून त्याच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.