नवी मुंबई : नवी मुंबई शहरामध्ये आगीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशातच शनिवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील रबाळे परिसरातील पेपर कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. तसंच आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी अचानक रबाळे येथील पेपर कारखान्यातून धुराचे लोट निघू लागले. बघता-बघता काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केलं. त्यानंतर स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. पेपर कारखान्याला आग लागल्याचं कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. मात्र, यावेळी दोन जवान जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहचल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पेपर कारखान्याला आग लागण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.